मुंबई - मुंबईतील मालाड परिसरातील एका व्यावसायिकाकडून 2 कोटी 25 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप अंमलबजावणी संचालनालयाच्या दोन अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची भीती दाखवून पैसे मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जयपूर येथील ईडी कार्यालयाशी संबंधित दोन अधिकारी मालाड पश्चिम परिसरातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी व्यावसायिकाच्या व्यवसायाबाबत चौकशी केली. त्यानंतर त्याचा गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांशी संबंध असल्याचा आरोप केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाला शोधमोहीम आणि अटकेची भीती दाखवली. सुरुवातीला 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आणि नंतर ही रक्कम 2 कोटी 25 लाख रुपयांवर निश्चित झाल्याचा आरोप आहे. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, 20 जुलै रोजी झालेल्या या कथित प्रकारानंतर 1 कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर 25 जुलै रोजी दिल्ली येथे व्यावसायिकाच्या सहकाऱ्यांनी उर्वरित 1 कोटी 25 लाख रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

