लोकशाही संपादकीय लेख
पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आज अचानक जळगावतील पेट्रोल पंपांवर अचानक वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्यामुळे ते बंद आहेत.
वास्तविक पाहता पेट्रोल पंपांवर पेट्रोल साठा आहे. पण डिझेलच्या साठा संपलेला असल्याने, डिझेल कार, ट्रक, ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन हे डिझेलसाठी वणवण भटकत आहेत. एक पेट्रोल पंप सोडून दुसऱ्या पेट्रोल पंपावर तर दुसऱ्या पेट्रोल पंपावरून तिसऱ्या पेट्रोल पंपावर वाहने गेली आणि रिकाम्या हाताने परत आली. डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतीची कामे अडकून पडली आहे.
ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर उभे आहेत. ट्रॅक्टर उभे असल्याने शेतीची कामे होत नाहीत. शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. जे लोक दुराचा प्रवास करण्यासाठी निघाले होते त्यांच्या गाड्यांमधील डिझेल संपल्याने चांगली तारांबळ उडाली आहे.
एक कारचालक तर म्हणाला की, आम्ही धाराशिव बीड मार्गे जळगावला आलो. वाटेत कुठेच डिझेल मिळाले नाही. सिल्लोडला फक्त 15 लिटर पेट्रोल मिळाले. त्यात आम्ही जळगाव पर्यंत आलो.
आम्हाला पुढे नागपूरकडे जायचे आहे. जळगावमध्ये मी चार पेट्रोल पंपवर डिझेल शोधले पण मिळाले नाही. आम्ही आता काय करावे? हे कळत नाही.
असा मनस्ताप कारचालक करत होते. एकंदरीत भाव वाढले तर वाढले पण टंचाई का निर्माण झाली? हे मात्र कळत नाही. कृत्रिम टंचाई तर निर्माण केली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे..!

