जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला. एका ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या दोन मुलांवर ते झोपेत असताना कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
या हल्ल्यात १३ वर्षीय मीरा सुभाष भिलाला हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय रामु सुभाष भिलाला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर आरोपी सुभाष गोपाळ भिलाला हा घटनास्थळावरून पळून गेला होता. माहिती मिळताच अडावद पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत जंगल परिसरातून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात, दोन्ही मुले घरात झोपेत असताना त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
घटनेनंतर वडती गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलीस करत आहेत.

