लोकशाही संपादकीय लेख
जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज अचानक जळगावच्या मुख्य बस स्थानकाला भेट देऊन सर्वांना चकित केले. सध्या तापमानाचा पारा 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेला आहे.
बस स्थानक या सार्वजनिक ठिकाणी लोकांची काय अवस्था होते आहे? हे अचानक भेटीतून कळेल म्हणून त्यांनी ही अचानक भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा अचानक भेटी दिल्या पाहिजे. बस स्थानकावर या कडक उन्हात जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेशी आहे की नाही?
हे प्रथम त्यांनी पाहिले. जर पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था होती तर आरओचे थंड पाणीही मिळत होते. दुसरी बाब म्हणजे स्वच्छतेची. स्वच्छतेच्या बाबतीत थोडीशी नाराजी दिसून आली.
त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे. त्या बाबतीत सूचन संबंधित डेपो मॅनेजरला देण्यात आल्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे सावली पुरेशी आहे काय?
उन्हाळ्यात प्रत्येक जण सावली शोधत असतो. प्रवासी वर्गाला सावली मिळायला त्रास होता कामा नये, म्हणून थोडी सावलीची व्यवस्था सुद्धा अपुरी असून ती वाढविणे आवश्यक आहे. अशा सूचना डेपो मॅनेजरला देण्यात आल्या आहेत. ज्या बाबींची त्रुटी आहे त्या सुधारण्यासाठी वाव आहे.
त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. आणखीन पंधरा दिवसानंतर आपण त्याचा आढावा घेऊन त्या सुधारणा झाल्या की नाही याचा पाठपुरावा करू, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा अचानक भेटीचा कार्यक्रम स्तुत्य असून त्यांनी इतरही सार्वजनिक ठिकाणी अशाच अचानक भेटी द्याव्यात ही आग्रहाची विनंती. त्यांनी आपला मोर्चा शहरातील गार्डनकडेही वळवावा. येथे काय काय सुविधा किंवा आहेत किंवा नाहीत हे लक्षात येईल. कडक उन्हाळ्यात गार्डन हे गरिबांसाठी सावलीचे ठिकाण आहे..!

