अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील खौशी येथे तलावात बुडून वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. मुलगा तलावात बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मृतांची नावे अण्णा एकनाथ तलवारे आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र अण्णा तलवारे अशी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, तलावातील गाळात वीरेंद्र फसल्याचे त्याच्या वडिलांच्या लक्षात आले. मुलाला वाचविण्यासाठी अण्णा तलवारे पाण्यात उतरले. मात्र, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तेही गाळात अडकल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले.
या घटनेमुळे खौशी गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या या दोन दुर्दैवी घटनांमुळे परिसरात शोक व्यक्त होत आहे. दोन्ही घटनांबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही व तपास सुरू आहे.

