लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी यंदाच्या मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. काठमांडू येथून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 31 मे दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात 5 ते 7 जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होऊ शकते.
पंजाब डख यांनी सांगितले की, आजपासून साधारण 12 दिवसांनी मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतीची तयारी वेगाने सुरू करावी. नांगरणी, मशागत, बियाणे व खतांची उपलब्धता याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये पूर्व-मोसमी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. 24 आणि 25 मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके, जनावरे आणि शेतीमाल सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामासाठी सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

