लोकशाही न्यूज नेटवर्क
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूच रहस्य उलगडलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यावर आता नाना पटोले सुद्धा बोलले आहेत. "अजितदादांसदर्भात विधानसभेत आम्ही सातत्याने भूमिका मांडली.
पण साधा एफआयआर सुद्धा दाखल होऊ शकला नाही. काय दडलेलं आहे" असं नाना पटोले म्हणाले. "गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख उद्धव ठाकरे साहेबांनी केला. मुंडेसाहेब मोठे नेते होते. त्यांचा अपघाताने मृत्यू झाला की, घातपाताने असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने याची चौकशी करावी. म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल" असं नाना पटोले म्हणाले.
"सत्ताधारी विरोधी पक्षात असताना रस्त्यावर मोर्चे काढायचे, फाटके कपडे घालून फिरायचे, गाडीभर पुरावे आणणार बोलायचे. पण कर्नाटकात कोणी मोर्चे काढले नाहीत. तिथे शेतकऱ्यांचं सरकार आहे. पण इथे नाहीय. आम्ही मोर्चे काढले की हे म्हणतात की, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. नाशिकच्या कुंभ मेळ्याची तयारी सुरु केली आहे. सहाकुंभ होतील एवढा पैसा तिथे खर्च करतायत. उत्तर प्रदेशपेक्षा जास्त पैसा सहापटीने का कशासाठी खर्च करताय" असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला.
"उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला म्हटलं की, तुमसे ना हो पायेगा ते बरोबर आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे. तिथल्या सरकारने 15 दिवसांच्या आत दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातली परिस्थिती भयावह आहे. 5 टक्के भागात पाऊस आहे, 95 टक्के भागात पाऊस नाही. सरकार म्हणतं एनडीआरएफ नियमात बसत नाही वैगरे, वैगेरे. मग डबल इंजिनचा फायदा काय. तिथे तर सिंगल इंजिन सरकार आहे. ही सरकार विरोधी व्यवस्था आहे" अशी टीका नाना पटोले यांनी केली.

