लोकशाही संपादकीय लेख
जळगाव शहरात महावितरण कंपनीच्या वतीने सक्ती करून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. या स्मार्ट मीटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना येत आहे. त्यामुळे हेच स्मार्ट मीटरवाले ग्राहक रस्त्यावर उतरले असून, 'आम्हाला हे बिल परवडणारे नाही.
आम्ही एवढी मोठी रक्कम भरू शकणार नाही,” असा दावा करीत आहेत. स्मार्ट मीटर बसवण्याआधी लोकांना, म्हणजे ग्राहकांना, विश्वासात घेणे गरजेचे होते. परंतु महावितरणने तसे केले नाही. त्यांनी सक्तीने बसविण्याचा उद्योग सुरू केला.
त्यामुळे आता त्यांचा भुर्दंड ग्राहकांवर पडत आहे. स्मार्ट मीटर हे त्यांना असह्य झाले आहे. हा प्रकार आता संपूर्ण शहरात स्मार्ट मीटर बसवायचे म्हटले तर किती त्रासदायक आहे. सुरुवातीला जे काही मीटर बसवण्यात आले, त्याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत वाईट येत असतील, तर शहरभर स्मार्ट मीटर बसवण्याचे कसे काय साध्य होईल?
त्यामुळे हे स्मार्ट मीटर एकदा तपासून घेतले पाहिजे. ते कशा पद्धतीने रन होतात की नाही, त्याचा अंदाज घेऊन हे स्मार्ट मीटर बसवायला हवे होते. जेव्हा एखाद्या ग्राहकाचे बिल सरासरी दोनशे रुपये येते आणि स्मार्ट मीटरमुळे जर ते बिल चारशे रुपये येत असेल, तर हा अन्यायच आहे. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊनच हे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम हाती घ्यायला हवे होते. अन्यथा अशा तक्रारी येतच राहणार आहेत.

