बारामतीः अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात, शिवसेनेच्या ठाकरे गटाने पुकारलेल्या 'रामरक्षा' आंदोलनांतर्गत, पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज बारामती तालुक्यातील मोरगावला भेट देऊन आंदोलन व रामरक्षा पठण केले.
तथापि, या कार्यक्रमामध्ये मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज बारामती दौऱ्यावर आहेत.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या कार्यक्रमात राडा घालणारे लोक हे भाजपचे पदाधिकारी होते. आपल्या पक्षाचे अपयश लपवण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांचे आरोप आम्हाला मान्य नाहीत. त्यांच्या विरोधात आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत. राडा घालणाऱ्यांची नावे आम्हाला माहित नाहीत. त्यांची पूर्ण माहिती घेऊ, असे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना हे कार्यकर्ते म्हणाले, की आमचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांना पहावलं नाही. त्यामुळे त्यांनी राडा घातला. संजय राऊत येथे आल्याचे समजल्यानंतर कुणीतरी त्यांना जाणून बुजून पाठवल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, रामरक्षा पठणानंतर एका सभेत बोलताना संजय राऊत म्हणाले, की राम मंदिरासाठी हजारो कार सेवकांनी बलिदान दिलं होतं. दानापोटी आलेले सुमारे १४०० कोटी रुपये लुटण्यात आले आहेत. ज्या रामाने सत्ता दिली त्याच्याच मंदिरात चोरी होते आणि आम्हाला म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडले आहे. आधी म्हणायचे देवाला घाबरले पाहिजे, पण आता देवच त्यांना घाबरायला लागला आहे.
राऊत पुढे म्हणाले, की यांची कृत्ये पाहून राम पुन्हा वनवासात जाईल. मोदींच्या खात्यात साडे दहा हजार कोटी रुपये असल्याचा दावाही त्यांनी केला.

