चिखली | गुरुवर्य अकॅडमी स्कूल येथे 'शैक्षणिक वारी २०२६-२७' उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही वारी शाळेपासून ते विठ्ठल मंदिर, टाळगाव चिखलीपर्यंत मोठ्या दिमाखात काढण्यात आली. वारकरी परंपरा आणि शिक्षणाचा सुंदर संगम साधत विद्यार्थ्यांनी या वारीच्या माध्यमातून समाजाला विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.
वारीदरम्यान विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंग, अभंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वारीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रस्ता सुरक्षा, प्लास्टिकमुक्त भारत, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, प्रदूषणमुक्त पर्यावरण, पर्यावरण संरक्षण, वीज बचत, डिजिटल सुरक्षा, आरोग्य हीच खरी संपत्ती, अन्न सुरक्षा आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर समाजाचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्यास नगरसेवक विकासभाऊ साने, विनायक आबा मोरे आणि नगरसेविका सोनमताई मोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य आणि विठ्ठल भक्तीगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी साहसी व मर्दानी खेळांची रोमहर्षक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमाला शाळेचे संचालक भूषण मावळे, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मावळे, समन्वयक मोहना मॅडम व प्रतिभा मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वैशाली अरगडे यांनी आभार मानले.
'ज्ञानाची वारी करूया, शिक्षणाचा दीप प्रज्वलित करूया' या प्रेरणादायी संदेशासह पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागरूकता कर्तव्यभावना अधिक दृढ झाली.

