Dailyhunt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात 'भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन २०२६' उत्साहात

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात 'भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन २०२६' उत्साहात

MahaeNews 1 week ago

पिंपरी-चिंचवड | जागतिक पृथ्वी दिनानिमित्त डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आकुर्डी येथे 'भारत पर्यावरण कार्यक्रम - भारत सस्टेनेबल कॅम्पस मिशन २०२६' उत्साहात पार पडला. हा उपक्रम रिसर्च हाईट्स फाउंडेशन आणि एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. श्रीमती पी. मालथी, समन्वयक डॉ. अशोक मोरे आणि डॉ. सुहास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

२२ ते २४ एप्रिलदरम्यान 'पृथ्वी सप्ताह' अंतर्गत महाविद्यालयात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले. स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने कॅम्पस ग्रीन ऑडिट व कचरा व्यवस्थापन मोहिम राबवली, तर इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनीअरिंग विभागाने 'हरित परिसर' स्वच्छता अभियान आयोजित केले. माहिती तंत्रज्ञान विभागाने 'प्लास्टिक मुक्त अभियान' राबवत जनजागृती केली.

पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेले हे उपक्रम कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 'विकसित भारत' संकल्पनेशी सुसंगत असलेला हा पुढाकार संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनाही पूरक ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील आकुर्डी शैक्षणिक संकुलाचे चेअरमन मा. सतेज पाटील, प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. तेजस पाटील तसेच संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचा हा उपक्रम केवळ शैक्षणिक मर्यादेत न राहता शाश्वत भविष्यासाठी नाविन्यपूर्ण पावले उचलण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स विभागाने शाश्वततेची शपथ व ऊर्जा बचतीवरील भित्तीपत्रक सादर केले. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन विभागाने प्लास्टिकविरोधी जनजागृती मोहीम हाती घेतली. इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाने नाविन्यपूर्ण शाश्वत कल्पनांवर भर दिला, तर संगणक अभियांत्रिकी विभागाने 'शून्य प्लास्टिक मोहीम' राबवून परिसरातील प्लास्टिक कचरा कमी करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. कचरा व्यवस्थापन, अक्षय ऊर्जा, जलसंधारण आणि हरित जीवनशैली यांसारख्या विषयांवर या माध्यमातून प्रभावी प्रबोधन झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: MahaeNews