मुंबई : देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला अधिक वेगवान आणि सक्षम करणाऱ्या वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अंतिम तीन टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या.
दादरी ते न्यू जेएनपीटी असा तब्बल १,५०६ किलोमीटरचा संपूर्ण कॉरिडॉर आता शंभर टक्के पूर्ण झाला आहे. अंतिम ३२६ किलोमीटरच्या टप्प्यांसाठी २० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. यावेळी न्यू जेएनपीटीहून पहिल्या व्यावसायिक मालगाड्यांनाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
कार्यक्रमास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
केवळ मालवाहतुकीसाठी उभारण्यात आलेला हा स्वतंत्र व पूर्णपणे विद्युतीकृत मार्ग देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गावर एकावर एक दोन कंटेनर घेऊन जाणाऱ्या मालगाड्या धावू शकणार असून, एका गाडीतून १३ हजार टनांपर्यंत मालवाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मालगाड्यांचा वेग सध्याच्या सुमारे २५ किलोमीटर प्रतितासावरून ७० ते १०० किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढण्यास मदत होणार आहे.
न्यू जेएनपीटी बंदर थेट उत्तर भारताशी जोडले गेल्याने महाराष्ट्रातील बंदरे, औद्योगिक क्षेत्रे आणि निर्यातदारांना मोठा फायदा होणार आहे. वेळेची बचत, वाहतूक खर्चात कपात आणि मालाच्या जलद पुरवठ्यामुळे उद्योग, व्यापार व निर्यातीला नवी चालना मिळणार आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती देणारा आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देणारा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

