सोळु | ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरतेचा उपक्रम म्हणून एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी यांच्या वतीने उन्नत भारत अभियान (UBA) अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोळु येथे नुकताच डिजिटल साक्षरता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संगणक व मोबाईलचा मूलभूत वापर, इंटरनेट सुरक्षितता तसेच शैक्षणिक उपयोगासाठी डिजिटल साधनांचा कसा उपयोग करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांकडून संगणक आणि मोबाईल अॅप्लिकेशन्सचा प्रत्यक्ष वापर पाहून अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक दिनकर राठोड व प्राध्यापक ओंकार डेंगी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर उन्नत भारत अभियान समन्वयक डॉ. श्रीराम कारगांवकर आणि संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांनी सहकार्य केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली विलास पालांडे, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी विद्यार्थी स्वयंसेवक गौरव माने, अपूर्वा पाटील, संकल्प भिसे, मेघाली मोटारे, वेदांत म्हस्के, सार्थक दराडे, श्रेयश नाझीरकर आणि शांतनू टोपे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मोठा हातभार लागला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे ही फक्त तंत्रज्ञानाची माहिती देण्याची बाब नाही, तर त्यांना भविष्यातील संधींसाठी सक्षम बनवण्याचा उपक्रम आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थी डिजिटल जगाशी जवळून ओळख होऊन आत्मविश्वासाने पुढे येतील.
- डॉ. बी. बी. वाफारे, संचालक.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

