यंदा पाऊस लवकर येणार आणि कडक उन्हाळ्यापासून आपली सुटका होणार, असं तुम्हालाही वाटत होतं का? जर हो, तर तुमच्यासाठी एक थोडी निराशाजनक बातमी आहे. हवामान खात्याचा मान्सूनबाबतचा पहिलाच अंदाज आता साफ चुकला असून, नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रातच रेंगाळल्याने पावसाने वाटेतच अचानक ब्रेक घेतला आहे.
दरवर्षी ठरलेल्या वेळेनुसार १ जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून, यंदा २६ मे रोजीच धडकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता हा अंदाज फोल ठरला असून मान्सूनच्या आगमनाला (Monsoon Arrival Delayed) आणखी काही दिवस उशीर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Monsoon Arrival Delayed In Kerala
त्यामुळेच साहजिकच महाराष्ट्रातही पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता आणखी काही काळ आकाशाकडे डोळे लावून ताटकळत राहावं लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजीच भारतात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी आवश्यक असलेले हवामानाचे निकष पूर्ण झाले नव्हते.
वारे समुद्रातच अडकल्याने आता केरळच्या किनारपट्टीवर मान्सून धडकण्यासाठी २ ते ४ जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते. म्हणजेच संपूर्ण भारतातच यंदा पाऊस दोन ते चार दिवस उशिराने एन्ट्री घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक यामुळे साहजिकच वाढली आहे. मान्सून लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धूळपेरणीचे प्रयोग अंगलट येऊ शकतात.
हवामानाचा लहरीपणा पाहता, जोपर्यंत जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही आणि चांगला पाऊस पडत नाही, तोवर पेरणीचा निर्णय घेणं धोक्याचं ठरू शकतं. या मधल्या काळात शेतकऱ्यांनी आपली शेतीची मशागत आणि पेरणीपूर्व कामे उरकून घ्यावीत, असा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. आता २ जूनला तरी पावसाची दमदार एंट्री होणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

