Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका..

मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका..

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुठभर किड्यांमुळे गव्हाचे पोते नष्ट करु नका. किडे जरुर चिरडून टाका, पण गव्हाचे पोते सुरक्षित ठेवा, अशी भावना अजीम नवाज राही यांनी व्यक्त केली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने अजीम राहील यांना प्रा. धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार देण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

'दमसा'च्यावतीने नितीन कोतापल्ले यांना वि.स.खांडेकर, पुरस्कार 'गुरू एका योगियाचे तुरियातील स्वप्न' या पुस्तकासाठी दिला. कवयित्री प्रतिभा खैरनार यांना जनाबाई पुरस्काराने गौरवण्यात आले. सामाजिक कार्यालयासाठी उल्का महाजन यांना तर धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार अजीम राही यांना देण्यात आला. शाल, सन्माचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरुप होते. (Presentation of the Damsa Awards)

बुलढाण्याचे कवी अजीम राही यांनी अल्पसंख्याकाची भावना बोलून दाखवली. ते म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी देशाची फाळणी झाली. अनेक मुस्लीम पाकिस्तानात गेले. पण आमच्या बापजाद्यांनी पाकिस्तान नाकारले. ज्या जमिनीत जन्मलो, वाढलो तिथे राहायचे असा निर्णय घेतला. पाकिस्ताने उर्दु राष्ट्रीय भाषा केली. त्याचा फटका माझ्यासारख्या उर्दुमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांना बसला. जीना जिंकला, मुसलमान आणि उर्दु हारली अशी अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पाचवीनंतर उर्दु ऐवजी मराठी भाषा शिकलो आणि माझी भाषा माय मराठी झाली. या माय मराठीतूनही माझ्या भावना व्यक्त करु शकलो त्यामध्ये त्यांनी माय मराठी भाषेचे कौतुक केले. मी दहावी नापास झालो तरी माझ्या कविता दहावी, बारावीच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना शिकवतात हे भाग्य माय मराठी भाषेमुळे लाभले.

सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सेझ विरोध आंदोलनामुळे सेझ हटला पण आता मात्र संपूर्ण देशच सेझखाली आला आहे असे मत व्यक्त केले. नितीन कोतापल्ले यांनी भ्रमचित्त काळापासून बाहेर पडण्यासाठी आत्मभान देणारे साहित्य वाचनाची गरज व्यक्त केली. बाईपणाच्या कवितेचा सन्मान होतो याचा आनंद आणि अभिमान वाटतो असे कवयित्री प्रतिभा खैरनार म्हणाल्या. (Presentation of the Damsa Awards)

प्रमुख पाहुणे डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, व्यवस्थेने प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे. आजच्या व्यवस्थेतला झोपेतून जागे करण्याची ताकद साहित्यीकांत असते. साहित्यिकच लोकशाहीची मुल्ये टिकवतात. त्यांनी व्यवस्थेची डुलकी मोडण्याचे काम लेखनीद्वारे करावे, त्यातून परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक प्रतिभांना उर्जा दिल्याने वैश्विकीकरण होते हेच या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. चंद्रकांत पोतदार यांनी सुत्रसंचालन केले. गोविंद पाटील यांनी आभार मानले. यावेळी 'दमसा' चे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, कार्याध्यक्ष दि.बा पाटील, कार्यवाह विनोद कांबळे उपस्थित होते.

असा झाला पुरस्कारप्राप्त लेखक, कवींचा गौरव

पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी- १. देवदत्त पाटील पुरस्कार ( कादंबरी) विभागून -धरणीमाय- शशिकांत चौधरी, भिंगुळवाणे दिवस -रमेश साळुंखे , २. शंकर खंडू पाटील पुरस्कार: स्त्रीप्रधान सर्वेपि सुखिन सन्तु - निलांबरी कुलकर्णी (कथासंग्रह), ३. अण्णा भाऊ साठे पुरस्कार: दाही दिशा -रवींद्र ठाकूर ( कादंबरी), ४. कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: महामुद्रा- धनंजय बिजले ( संकीर्ण), ५. शैला सायनाकर पुरस्कार: माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ-चंद्रकांत बाबर (कवितासंग्रह), ६ .चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- घुंगुरमाळा- महानंदा मोहिते आणि ७. बालवाड्मय पुरस्कार- श्री संवाद-श्रीयांश हराडे .

विशेष पुरस्कार : १. ऋजुता माने पुरस्कार - थिजलेल्या माणुसकीचा गहिवर- सोनिया पाटील,२. कर्तृत्वाचा एक शोध,-रवींद्र बेडकीहाळ, ३. गुलामी जिणं -रमेश जावीर, ४. जगाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज- मधुकर जाधव, ५. चलबट – अर्जुन व्हटकर, ६. राजधुरंदर ताराराणी -राजेंद्र घाडगे, ७. अर्थतरंग -संजय ठिगळे, ८. कोलाहालची क्षणचित्रे -लवकुमार मुळे, ९. फक्कड सचिन अवघडे, १०. घनघोर काळीजभर -रवी बावडेकर, ११. तू ही गोष्ट सांगायला नको होती – सुनील साळुंके, १२. वंचितांचे राजकारण एक मुक्त चिंतन -सिद्धार्थ कांबळे, १३. मी चंदन व्हाया बघतो -सुधाकर इनामदार, १४. स्त्री क्षेत्र ऋतुक्षेत्र अम्बुबीजानाम्- दिपाली घाडगे, १५. अंतरंग शब्दाचे – संजय वारके, १६. निळी सावळी नव्हाळी-स्वाती पाटील, १७. सायतारे -प्रकाश कुलकर्णी, १८.काठावरच्या चेह-यांच्या कथा – सुरज चौगुले १९. महात्मा बसवेश्वर आणि संत ज्ञानेश्वर यांचे सामाजिक चिंतन – चारुदत्त कासार. ((Presentation of the Damsa Awards)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Dinman