बुलडाणा : खरीप हंगाम जवळ येत असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरघसरणीचा फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांत बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल सुमारे 700 रुपयांची घट झाली असून भाव 7,500 रुपयांवरून 6,800 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी सध्या माल विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात भाव वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीनचा साठा करून ठेवत आहेत. याचा परिणाम बाजारातील आवकेवरही दिसून येत असून रिसोड आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये मिळून केवळ 1,317 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली.
मात्र, खरीप पेरणीसाठी बियाणे, खते आणि इतर शेती खर्च भागवण्यासाठी निधीची गरज असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या घसरत्या दरांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

