म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२८) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड होण्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब होणार आहे.
चित्रपट महामंडळाच्या १७ जागांसाठी ६० अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारीचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे विविध आमिषे आणि दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबई यासह राज्यातील विविध भागांतील पडद्यामागचे आणि पडद्यावरचे कलावंत या निवडणुकीत उतरले आहेत.
मावळते अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तयार होणार असून, दुसरे पॅनल कुणाचे याची उत्सुकता आहे. गुरुवारनंतरच या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.
नीलम शिर्केंनी घेतली माघार
अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून माघार घेतली. वर्षा उसगावकर निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात आपल्याला लढायचे नाही, कोणतेही राजकारण करायचे नाही असे कारण देऊन नीलम यांनी माघार घेतली. मात्र, यामागे खरं कारण का? हा चर्चेचा विषय बनला आहे.
'पाच ठिकाणी मतदान सुविधा हवी'
अभिनेत्री या गटात अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अचानक माघार घेतल्याने वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. याशिवाय संकलन विभागात विजय खोचीकर, तर गायन विभागात आनंद शिंदे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे सावंतवाडी आणि नागपूर या पाच ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेघराज भोसले यांनी केली आहे

