लाफ्टर क्वीन भारती सिंह आणि अभिनेते शेखर सुमन यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली FIR 16 वर्षांनी रद्द करण्यात आली आहे. सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवर प्रसारित झालेल्या एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप भारती सिंह आणि शेखर सुमन यांच्यावर करण्यात आला होता.
या प्रकरणामध्ये गुन्ह्याच्या श्रेणीत मोडण्यासारखे काहीही नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे.
'स्टँड-अप कॉमेडी'कडे गांभीर्याने पाहिले जाऊ नये, असेही न्यायालयाने नमूद केले. भारती आणि शेखर यांच्या विरोधातील ही एफआयआर 2010 मध्ये दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात भारती आणि शेखर यांच्याव्यतिरिक्त, एका पटकथा लेखकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला होता.
'रझा अकादमी'च्या एका प्रतिनिधीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन ही एफआयआर नोंदवण्यात आला होता. शेखर सुमन 'कॉमेडी सर्कस का जादू' या विनोदी कार्यक्रमात सहसूत्रसंचालक होते. भारती सिंग हिने कुराणातील एका वाक्यावरुन विनोद केला होता; तिचा हा विनोद इस्लाम धर्माचा अपमान करणारा असल्याचे म्हटले गेले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, भारतीनंतर शेखरनेही तेच वाक्य उच्चारले होते. 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, आपल्या परफॉर्मन्सदरम्यान भारती म्हणाली होती, "या अल्लाह! रसगुल्ला! दही भल्ला!"
भारती सिंह, शेखर सुमन आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 295 (कोणत्याही धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाला इजा करणे किंवा ते अपवित्र करणे) आणि कलम 34 (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारती सिंह आणि शेखर सुमन यांचे वकील नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला की, या दोन्ही व्यक्ती केवळ परीक्षक आणि कलाकार म्हणून आपली भूमिका पार पाडत होते; त्यामुळे, पोलिसांचा तपास पूर्णपणे अनावश्यक, असमर्थनीय आणि अवाजवी होता. त्यांनी म्हटले, "या कार्यक्रमाचा उद्देश केवळ हलक्या-फुलक्या मनोरंजनाचा होता, यात कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या किंवा समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा, त्यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू मुळीच नव्हता."
भारती सिंह आणि शेखर सुमन यांचा उद्देश: लोकांना हसविणे
अतिरिक्त सरकारी वकील मेघा बाजोरिया यांनी नमूद केले की, झालेल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता, याचिकाकर्त्यांनी कथित गुन्हा केला आहे की नाही, या प्रश्नाची छाननी खटल्यादरम्यान केली जाईल. एफआयआर रद्द करताना, न्यायमूर्ती अमित बोरकर यांचा समावेश असलेल्या एकल न्यायाधीश खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, अशा कार्यक्रमांमधील कलाकार आणि परीक्षकांचा उद्देश लोकांना हसवणे हा असतो; ते कोणत्याही धार्मिक गटाविरुद्ध घोषणा करणाऱ्या वक्त्याच्या भूमिकेत नसतात.
मुंबई उच्च न्यायालयाचा भारती सिंह आणि शेखर सुमन यांच्या बाजूने निकाल
मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, या दोघांवर ज्या भूमिकांवरुन आरोप करण्यात आले होते, त्या तक्रारदाराने केलेले आरोप अत्यंत अतिशयोक्तीपूर्ण होते; तसेच भारती आणि शेखर यांचा कोणताही हेतुपुरस्सर किंवा दुर्भावनापूर्ण उद्देश होता, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा त्यांच्याविरुद्ध आढळला नाही. खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले, "हा परफॉर्मन्सचा प्रकार नाटकासारखा होता, ज्याचा उद्देश केवळ मनोरंजन करणेच होता. केवळ या गोष्टीमुळेच त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होत नाही." न्यायालयाने पुढे असेही नमूद केले की, त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालू ठेवणे हे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करण्यासारखे ठरेल. अखेर 16 वर्षांनी या प्रकरणाचा छडा लागला आहे.

