Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BMC Mayor Ritu Tawade : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुंबईच्या महापौरांना उत्तराखंडमध्ये बहुमान

BMC Mayor Ritu Tawade : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुंबईच्या महापौरांना उत्तराखंडमध्ये बहुमान

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीची ११७ वी बैठक ३ आणि ४ जून २०२६ असे दोन दिवस होत आहे.

या बैठकीत परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची सूत्रे महापौर रितू तावडे या स्वीकारणार आहेत. ऋषिकेशमध्ये उद्या ३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीची प्रमुख बैठक होत आहे. त्याचा शुभारंभ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यकारी समिती बैठकीस केंद्रीय गृहनिर्माण तसेच नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे नागरी विकास मंत्री रामसिंह केडा यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. या बैठकीत देशभरातील विविध प्रमुख शहरांचे महापौर आणि उत्तराखंड राज्यातील सर्व महापौर उपस्थित राहणार आहेत.

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीच्या उपाध्यक्ष म्हणून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे नाव परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने निश्चित केले आहे. कार्यकारी समितीद्वारे बैठकीमध्ये त्याची घोषणा केली जाईल आणि त्यानुसार तावडे या उपाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा राहणार आहे.

आधी महाराष्ट्राच्या महापौर परिषदेचे अध्यक्षपद, आता देश स्तरावर संधी

उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणून देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काही दिवसांपूर्वी सूत्रे स्वीकारली. त्यापाठोपाठ राष्ट्रीय पातळीवर हा उपाध्यक्ष पदाचा बहुमान मिळाल्याने महापौर श्रीमती तावडे यांच्या रूपाने मुंबईचा गौरव वाढला आहे.

अखिल भारतीय महापौर परिषद ही १९६२ पासून कार्यरत असलेली संस्था आहे. नवी दिल्ली येथे संस्थेचे मुख्यालय आहे. आजघडीला देशातील विविध राज्यातील मिळून सुमारे २४० महापौर या परिषदेचे सदस्य आहेत. पैकी, कार्यकारी समितीमध्ये एकूण ६० जणांचा समावेश असतो.


कर्नाल (हरियाणा) शहराच्या महापौर रेणुबाला गुप्ता या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून सप्टेंबर २०२५ पासून कार्यरत असून त्यांचा कार्यकाळ देखील दोन वर्षांचा आहे.

महापौरांचे एका व्यासपीठावर संघटन असावे, महापौर या पदाची कर्तव्ये, अधिकार, जबाबदाऱ्या, मागण्या, लोकाभिमुख कामकाज करण्याच्या दिशेने गरजा आणि त्याचा शासनाकडे पाठपुरावा अशा विविध स्तरांवर ही अखिल भारतीय महापौर परिषद महत्त्वाची भूमिका बजावत असते.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims