मुंबई : येत्या १ मे पासून राज्यात जनगणना सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच स्व-गणना अशी नवीन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी स्व-गणना पोर्टल 1 मे ते 15 मे पर्यंत कार्यरत होणार आहे.
अवघ्या 15 ते 20 मिनिटात स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करण्यात येता येणार आहे. या स्व-गणनेदरम्यान कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्याची आवशक्यता नाही. राज्याच्या जनगणना कार्य संचालनालयच्या संचालक निरुपमा डांगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना se.census.gov.in या संकेतस्थळावर जावून स्वत:ची माहिती ऑनलाइन भरता येईल.
यंदाची १६ वी जनगणना आहे. दोन टप्प्यात यंदाची जनगणना पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी २ लाख ६४ हजार पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे. स्व-गणना पूर्ण झाल्यावर एस इ आयडी दिला जाणार आहे. स्व-गणना ही बंधनकारक नसून ती ऐच्छिक आहे. १६ मे १४ जून या कालावधीत अधिकारी घराघरात जावून पडताळणी करणार असून संकलित केलेले सर्व माहिती ही गोपनीय ठेवली जाणार आहे. सपूर्ण आणि अचूक माहिती अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन निरुपमा डांगे यांनी केले आहे.
जनगणना कार्य संचालनालय नेमकं काय म्हणाले?
जनगणना 2027 साठी राज्यातील सर्व जिल्हे/तालुके/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी प्रशासकीय सीमा गोठवण्यात आल्या आहेत, म्हणजेच त्यात कुठलेही बदल करता येणार नाहीत. महाराष्ट्र शासनाने या संदर्भातील राजपत्र अधिसूचना 15 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर 23 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाने जनगणना अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना प्रकाशित केली; याद्वारे क्षेत्रीय कार्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक राज्य/जिल्हा/वैधानिक शहर/तालुका स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात आली.
राज्य शासनाने 16 फेब्रुवारी 2026 रोजी 33 प्रश्न अधिसूचित केले आहेत. गृह-यादी टप्प्यात लोकांना हे प्रश्न विचारले जातील. यातून घराची स्थिती, सोयी-सुविधा आणि घरगुती मालमत्ता यांविषयीची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित होईल.

