समाजात वेळोवेळी घडणाऱ्या धक्कादायक घटनांचं प्रतिबिंब रूपेरी पडद्यावर उमटत असतं आणि अशाच एका गाजलेल्या प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या आगामी मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.
'आता सगळं उघड होणार...!' अशी या सिनेमाची टॅगलाइन असून दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत यानं सांभाळली आहे.
सिनेमाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पाठमोरी उभी असलेली व्यक्ती, हातात पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडल, सभ्य पोषाख, क्राइम सीनच्या फिती आणि 'नाशिक' तसंच 'भोंदूबाबा' असे लिहिलेले संदर्भ पाहता हा चित्रपट अशोक खरात अर्थात तथाकथित 'कॅप्टन भोंदू बाबा'च्या काळ्या कारनाम्यांवर भाष्य करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील अडचणीत आल्या, रुपाली चाकणकरांनी त्याला गुरू मानलं होतं, तसंच त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळं या सिनेमात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत कोण असणार याबद्दल चर्चा रंगली होती, यातच लोकप्रिय अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांना या भूमिकेसाठी विचारणा झाली असल्याचा खुलासा त्यांनी स्वत: एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. यासोबतच त्यांनी एक धक्कादायक खुलासाही केलाय. या भूमिकेसाठी माझं नाव चर्चेत आल्यापासून अनेकांचे ही भूमिका स्वीकारू नका, यासाठी दबावाचे फोन येत असल्याचं त्यांनी म्हटलं.
नेमकं काय म्हणाल्या दीपाली सय्यद?
रुपाली चाकणकरांचीची भूमिका करतेय, हे अद्याप नक्की नाहीये, ते लवकरच कळेल. तसंच राजकीय नेत्यांचं नाव जोडलं गेलं असल्यामुळं एक कलाकार म्हणून दबाव नाही टाकला पाहिजे, पण मला फोन येतायत. मी काम करतेय,ते माझं प्रोफेशनल आहे. मला फोन येत असतील तर हे करू नका. तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील असं सांगणारे महिला नेत्यांचे फोन येतायत. पण या दबावाला मी घाबरत नाही,मी काम करणार आहे, असंही दीपाली यांनी म्हटलं.
यासंदर्भात मी माझ्या पक्षश्रेष्ठींसोबत बोलणार असल्याचं,ही दीपाली यांनी म्हटलंय.
दरम्यान, दिग्दर्शक स्वरूप सिनेमाविषयी म्हणाला, "हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून समाजाला प्रश्न विचारणाराही आहे. आपण अनेकदा बाहेरून सज्जन दिसणाऱ्या लोकांवर सहज विश्वास ठेवतो, पण त्या मुखवट्यामागे किती भीषण वास्तव दडलं असू शकतं, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सिनेमातून करत आहोत. ही कथा कोणत्याही एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, समाजातील अंधश्रद्धा, पैशाची लालसा आणि सत्तेच्या गैरवापराचं विदारक चित्र मांडणारी आहे. प्रेक्षकांनी चित्रपट पाहताना केवळ एक घटना म्हणून न पाहता, आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे.' सागरकुमार जैन यानं या सिनेमाची कथा लिहिली असून, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यानं लिहिले आहेत. या सिनेमाची निर्मिती देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी केली आहे.

