Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
GT vs RR Qualifier 2: मॅच गमावल्यानंतर रियान परागची उडवाउडवीची उत्तरं; पराभवासाठी खेळाडू नाही तर 'ती' एक गोष्ट जबाबदार

GT vs RR Qualifier 2: मॅच गमावल्यानंतर रियान परागची उडवाउडवीची उत्तरं; पराभवासाठी खेळाडू नाही तर 'ती' एक गोष्ट जबाबदार

न्यू चंदीगढ: गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा प्रवेश केला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने आयपीएल 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून पराभूत केले.

पाच हंगामांमधील ही संघाची तिसरी अंतिम फेरीतील उपस्थिती आहे, जिथे त्यांचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी होईल. कर्णधार गिलने शानदार शतक करून गुजरातला हा विजय मिळवून दिला. वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांची खेळी वाया गेली अन् राजस्थानचे यंदा चॅम्पियन बनण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. वैभव, जडेजा आणि फरेरा यांच्या जीवावर राजस्थानचा संघ 214 धावांपर्यंत पोहोचला. वैभवचे पुन्हा एकदा शतक हुकले तो 96 धावा करुन बाद झाला. यानंतर फायनलचे तिकीट पक्के करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या गुजरात संघाकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने कमाल कामगिरी केली. गिलने शानदार शतक ठोकले तर साईने अर्धशतक ठोकले. सुंदर बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया आणि जॉस बटलरने मॅच संपवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केला.

पराभवावर कर्णधार रियान परागचे मत

रियान परागने पराभवावर आपले मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की "215 धावांची धावसंख्या बचावण्यासारखी होती, पण खेळपट्टीवर चेंडूला जास्त उसळी येत असल्याने फलंदाजी करणे थोडे सोपे झाले. पहिल्या डावात फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळत होती, कारण संथ आणि आखूड चेंडू खेळपट्टीवर थोडे जास्त थांबत होते. 215 ही एक चांगली धावसंख्या होती, पण अधिक धावांची गरज होती. जर धावसंख्या 230-240 असती, तर गुजरातला पाठलाग करणे खूपच कठीण झाले असते; हे खरं आहे की आम्ही गुजरातच्या सलामीवीरांना लवकर बाद करण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे नंतर आमच्यासाठी गोष्टी अत्यंत कठीण झाल्या." रियानच्या मते पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार आहे

राजस्थान रॉयल्सच्या हंगामाबद्दल बोलताना, "मी याला सकारात्मक गोष्टींनी भरलेली मोहीम असे वर्णन करतो. इतका तरुण आणि अननुभवी संघ पात्र ठरेल अशी अपेक्षा फार कमी लोकांनी केली होती. तो संघातील खेळाडूंच्या धैर्याची आणि उत्साहाची प्रशंसा करतो, ज्यांनी अनेक बदल आणि वेगवेगळे संयोजन दाखवले; तिसऱ्या स्थानावर राहिल्याने भविष्यासाठी एक मजबूत पाया घातला गेला आहे."

रियान पराग वैभव सूर्यवंशीबद्दल काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना, पराग म्हणतो की, "तरुण खेळाडू जे काही करत आहे त्याचे वर्णन करणे कठीण आहे. ही केवळ अंधाधुंध केलेली फलंदाजी नाही, तर विचारपूर्वक केलेली फलंदाजी असून, त्यासोबतच खेळाची उत्तम समज आणि परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्याची उत्तम क्षमता आहे. मला आशा आहे की सूर्यवंशी असाच प्रगती करत राहील, दीर्घकाळ भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि अखेरीस राजस्थान रॉयल्सला त्यांचे दुसरे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यास मदत करेल."
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims