म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: इराण युद्धामुळे हवाई इंधनाच्या (एअर टर्बाइन फ्युएल - एटीएफ) कडाडलेल्या दरामुळे वाढलेल्या उड्डाण खर्चाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने जून ते ऑगस्ट या कालावधीत देशांतर्गत विमानोड्डाणांमध्ये २२ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.
त्यामुळे यंदाच्या मोसमात विमानसेवांच्या गोंधळामुळे देशांतर्गत प्रवासाला प्राधान्य दिलेल्या अनेक पर्यटकांसमोर विमान रद्द झाले तर परतण्याचा पर्याय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एअर इंडियाने अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवांध्ये कपात केली होती.
७९० हून अधिक उड्डाणांना फटका
काही पर्यटन व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय विमानांना जोडणारी विमाने कमी केल्याने प्रवाशांना याचा फारसा फटका बसणार नाही. ही विमाने आंतरराष्ट्रीय मार्गावरून आलेल्या प्रवाशांना देशांतर्गत शहरांशी जोडणारी फीडर विमाने आहेत. यामध्ये बहुतांश प्रवासी हे आंतरराष्ट्रीय मार्गावरून आलेले असतात. मूळ आंतरराष्ट्रीय विमानेच सध्या रद्द झाल्याने देशांतर्गत प्रवाशांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक अमर ऐनापुरे यांनी दिली. या प्रवाशांना नंतरच्या विमानात सामावून घेतले जाईल. तसेच सध्या देशांतर्गत प्रवासी खूप नसल्याने इतर विमानसेवाही पूर्ण क्षमतेने वापरल्या जात नसल्याचे दिसते. त्यामुळे विमानात जागा शिल्लक असल्याने मागणी कमी असल्याने ही तिकिटे आयत्या वेळी फारशी चढ्या भावाने विकली जाणार नाहीत असाही अंदाज त्यांनी वर्तवला. या कपातीकडे इंधन बचतीचा पर्याय म्हणून पाहण्याचा मुद्दाही या निमित्ताने समोर आला आहे.
इंधनाची बचत होणार
परिणाम काय ?
काही ठरावीक मार्गांवर ही कपात करण्यात आल्याचे एअर इंडियाने जाहीर केलेले असले तरी ट्रॅव्हल एजंटकडे आलेल्या यादीनुसार काही मार्गांवर आठवड्यातील सहा दिवस एखादी सेवा रद्द झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये मुंबई-जयपूर, जयपूर-मुंबई, दिल्ली-नागपूर, मुंबई-हैदराबाद, गोवा-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-भोपाळ, दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-हैदराबाद अशा सेवांचाही समावेश आहे. दिवसभरात काही विमानतळांवरून दिल्ली, अहमदाबादसारख्या शहरांमध्ये जाणाऱ्या अनेक विमानसेवा असल्या तरी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी रद्द झालेल्या सेवांमुळे प्रवाशांना अधिक फटका बसेल असा अंदाज आहे.
