तिरुअनंतपुरम : केरळातील एका रिक्षा चालक महिलेशी झालेले एक साधे संभाषण अनपेक्षित प्रेरणादायी भेट ठरल्याचे एका उद्योजिकेने सांगितले. शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी या महिलेने आयटी मॅनेजरचा प्रतिष्ठित आणि भरगच्च पगार असलेला जॉब सोडला.
त्यानंतर तिने थेट रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.
डॉ. नेझरीन मिधलाज यांनी इन्स्टाग्रामद्वारे सांगितलेल्या या कहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रिक्षा चालक महिलेला भेटल्यानंतर शांत स्वभावाने व आत्मविश्वासाने प्रभावित झाल्याचा अनुभव डॉ. मिधलाज यांनी सांगितला.
रिक्षा चालक महिलेशी संवाद
या व्हिडिओ क्लिपमध्ये, डॉ. मिधलाज केरळातील एक महिलेच्या रिक्षामधून प्रवास करत असताना तिच्याशी संवाद साधताना दिसतात. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात काम करताना तिला कसं वाटतं, असा प्रश्न त्या तिला विचारतात. या संपूर्ण संवादादरम्यान, ती महिला अत्यंत निवांत आणि आनंदी दिसते. चेहऱ्यावर हास्य कायम ठेवून तिने आपल्या आयुष्याबद्दल आणि कारकिर्दीबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.कॉर्पोरेट जॉब सोडून रिक्षा
मिधलाज यांच्या माहितीनुसार, त्या रिक्षाचालक महिलेने सांगितलं की, तब्बल नऊ वर्षे आयटी मॅनेजर म्हणून काम केल्यानंतर तिने ते क्षेत्र सोडलं. "ती म्हणाली की, ती गेली ९ वर्षे आयटी मॅनेजर म्हणून कार्यरत होती," असे मिधलाज यांनी व्हिडिओ कॅप्शनमध्ये नमूद केले. "नोकरीशी संबंधित असलेला दबाव, तणाव आणि सततची धावपळ मागे सोडल्याचे तिने सांगितले. कॉर्पोरेट विश्वातच रेंगाळत राहण्याऐवजी, या महिलेने एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला आणि स्वतःची रिक्षा चालवण्यास सुरुवात केली." असे त्या पुढे लिहितात.महिन्याची कमाई ६० हजार
मिधलाज यांनी पुढे सांगितले की, त्या रिक्षा चालक महिलेने मला सांगितले की, आता ती महिन्याला सुमारे ६० हजार रुपये कमावते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, ती आपल्या आयुष्यात मनापासून आनंदी आहे.या संवादाने मिधलाज यांच्या मनावर खोलवर छाप सोडली. स्वतःला खऱ्या अर्थाने कशामुळे समाधान मिळते, हे विचारण्यासाठी लोक अनेकदा न थांबता, प्रतिष्ठा, पदव्या आणि यशाच्या पारंपरिक कल्पनांचा पाठलाग करतात. पण प्रत्येक यशोगाथा सारखी नसते" असे लिहित मिधलाज म्हणतात की, कधीकधी प्रतिष्ठेपेक्षा शांततेला प्राधान्य देणे हा एखाद्या व्यक्तीने घेतलेला सर्वात धाडसी निर्णय असू शकतो.
नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सच्या पसंतीस उतरला. त्यापैकी अनेकांनी रिक्षा चालक महिलेच्या निर्णयाचे आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. सामाजिक अपेक्षांपेक्षा आनंद आणि मनःशांती अधिक महत्त्वाची आहे, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे.इतरांनी त्यांच्या ओळखीच्या अशा लोकांची उदाहरणे दिली, ज्यांनी पूर्णपणे वेगळ्या करिअरसाठी पारंपरिक नोकऱ्या सोडल्या होत्या. अशा निर्णयामुळे अनेकदा अधिक चांगली मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्यही लाभते.

