जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत, 30 मे पासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट करताना जरांगे-पाटील यांनी 'उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल', असा इशारा दिला.
उपोषणादरम्यान, मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे येऊ नये', असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मनोज जरांगे काय म्हणाले?
'चर्चेसाठी वेळ दिला आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. उष्माघातानं बळी गेला तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार जबाबदार असेल. सरकारचा नाहीतर माझा तुकडा पडेल. सरकारला आता वेळ तरी किती देऊ? उपोषणात पाणी, अन्न, चप्पल साऱ्या गोष्टींचा त्याग करणार आहे. मराठा समाजाच्या मुलांचा सरकारने उन्हाळा केला. देशात कुठेच झालं नाही असं कठोर उपोषण मी करणार आहे', असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही
पुढे ते म्हणाले की, 'मला आता आरपारची लढाई लढायची आहे. सगळ्या मागण्या सांगितल्या, सर्व समजून सांगितलं तरी आरक्षण नाही. प्रेमानं सांगितलं, मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही. मराठ्यांची लेकरंबाळं अधिकारी झाली पाहिजेत', असंही ते म्हणाले. 'पश्चिम महाराष्ट्रात सधन, फळबागा आहेत म्हणता, ओबीसीकडेही आहेत. सधन आणि फळबागा हा काय आरक्षणाचा निकष आहे का?', असं मनोज जरांने पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. आता त्यांच्या या आमरण उपोषणाला सरकार काय उत्तर देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

