पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील प्रवासी वाहतूककोंडीमुळे त्रस्त आहेत. वीकेंडला तर गाड्यांच्या मार्गावर रांगा लागतात. त्यात काही महिन्यांपूर्वी महामार्गावर टँकर उलटल्यामुळे 32 तास वाहतूक कोंडी झाली होती.
बऱ्याच काळापासून महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार आहे. पण प्रत्यक्षात काम कधी सुरू झालं नाही. आता सततच्या होणाऱ्या वाहतूककोंडीनंतर प्रशासनाला जाग आली असून येत्या पावसाळ्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला दहा पदरी करण्याचं काम सुरू होणार आहे.
टोल वसुलीचा कालावधी वाढणार
MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच, महामार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काम हाती घेतलं जाणार आहे. या वर्षी काम सुरू झालं तर हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. आधीपासूनच आवश्यक जमीन उपलब्ध असल्यामुळे 2029 ते 30 पर्यंत महामार्गाचा विस्तार पूर्ण होईल.
एका महिन्यात 'मिसिंग लिंक'
नवी मुंबईतील कळंबोलीपासून सुरू होणार हा महामार्ग पुण्यातील किवळेपर्यंत विस्तारलेला आहे. 2002मध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

