Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईतील झाडं तोडून पनवेलमध्ये पुनर्रोपण, Versova-Dahisar Coastal Roadसाठी १,२०० झाडं तोडण्यास मंजुरी

मुंबईतील झाडं तोडून पनवेलमध्ये पुनर्रोपण, Versova-Dahisar Coastal Roadसाठी १,२०० झाडं तोडण्यास मंजुरी

.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महापालिकेच्या वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात एकूण एक हजार ९०० झाडे बाधित होणार आहेत. त्यापैकी एक हजार २०० झाडे तोडण्यात येणार असून या प्रस्तावाला शुक्रवारी वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी देण्यात आली.

बहुतांश झाडे ही चारकोप तसेच गोरेगाव भागातील आहेत. उर्वरित ७०० झाडांचे पुनर्रोपण पनवेलमध्ये करण्यात येणार आहे.

७०० झाडे पुनर्रोपित करणार

ही झाडे हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला होता. मुंबई महापालिका आयुक्त हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून, विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक हे प्राधिकरणाचे सदस्य आहेत. महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सागरी किनारा मार्गातील एक हजार ९०० झाडे तोडण्यास प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. त्यापैकी एक हजार २०० जाडे तोडावीच लागतील, तर उर्वरित झाडे पुनर्रोपित करावी लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पनवेल येथे ही ७०० झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत.


मालाड माइंडस्पेस परिसरातील एमडीपी रोड या उपनगरातील महत्त्वाच्या मार्गावरील सर्वाधिक, ८१५ झाडे बाधित होणार असून त्यापैकी ११८ झाडे तोडली जाणार आहेत. माइंडस्पेस ते चारकोप टप्प्यात ४७ झाडे तोडण्यात येणार असून त्याबदल्यात ५७५ झाडे लावली जातील. तर गोराई इंटरचेंज ते दहिसर मार्गावर ८० झाडे तोडली जाणार असून १०२ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. बंगूरनगर ते मालाड माइंडस्पेस या टप्प्यात २३६ झाडे तोडली जातील. यासह अन्य भागातही झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची मिळणार जोड

वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग या २२ किमी लांबीच्या मार्गाचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. हा मार्ग काही पट्ट्यांत दुहेरी उन्नत मार्ग असेल, तर काही पट्ट्यांत खाडीखालून बोगद्यातून जाईल. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही या मार्गाला जोड देऊन पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. यामुळे प्रवास वेगवान होणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे. या सागरी किनारा मार्गाला दहिसरपासून भाईंदरपर्यंत उन्नत मार्गाची जोड दिली जाणार आहे. सहा टप्प्यांत होणाऱ्या वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचा खर्च १६ हजार ६२१ कोटी रुपये आहे.

'पुनर्रोपण मुंबईतच हवे'

या ७०० झाडांचे पनवेलमध्ये पुनर्रोपण करण्यास महापालिकेतील सभागृह नेते खणकर यांनी विरोध केला आहे. मुंबईत सुमारे ४५ हजार सोसायट्या आहेत. प्रत्येक सोसायटीने एक झाड लावले, तरी पर्यावरणाची हानी टळेल आणि पर्यायी झाडेही मुंबईला मिळतील, अशी सूचना आपण प्राधिकरणाच्या बैठकीत केल्याचे खणकर यांनी सांगितले.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims