साऊथकडील एक प्रसिद्ध आणि अजरामर नाव म्हणजे नंदामुरी तारक रामाराव उर्फ NTR. यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर उचललेले प्रत्येक पाऊल, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर एक अमिट छाप उमटवली.
आज त्यांची जयंती आहे.
एन टी रामाराव यांचे करियर
पौराणिक पात्रांपासून ते लोकनायकांच्या गाथांपर्यंत, सामाजिक नाटकांमधील सामान्य माणसापासून ते सम्राटांपर्यंत त्यांनी प्रत्येक पात्रात प्राण फुंकले आणि ते जनसामान्यांमध्ये एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते बनले. केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातही NTR यांनी स्वतःचे एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले. लोकांची सेवा करण्याची इच्छा मनी बाळगून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि आपल्या अफाट लोकप्रियतेच्या जोरावर, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दोन कार्यकाळ सेवा बजावली.
एन टी रामाराव यांचे समाजकार्य
एनटीआर यांनी तेलुगू राज्यात अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. 'दोन रुपयांना एक किलो तांदूळ' आणि 'जनता वस्त्रालू' यांसारख्या योजनांनी गरिबांच्या आयुष्यात आशेचा किरण आणला. ते असे नेते होते ज्यांनी शासक म्हणून नव्हे, तर लोकांचे सेवक म्हणून कार्य केले. एनटीआर यांच्या आयुष्याचा आणखी एक रंजक पैलू म्हणजे त्यांचे प्रेमसंबंध. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वीच, त्यांनी बसवतारकम हिच्याशी विवाह केला होता.
लग्न झालेले असूनही दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात
या दांपत्याला केवळ एक-दोनच नव्हे, तर तब्बल 12 मुले झाली. सर्व काही सुरळीत चालू होते, मुलंही मोठी झालेली पण नंतर एनटीआरचे त्या संसारातील मन उडू लागले. ते दुसऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडले. त्या काळातील एक आघाडीची नायिका असलेल्या कृष्णा कुमारी यांच्याशी त्यांची जवळीक वाढू लागली. तारक रामाराव यांनी कृष्णा कुमारी यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, असेही म्हटले जाते की, इतर कोणत्याही अभिनेत्रींच्या तुलनेत, त्यांनी कृष्णा कुमारी यांच्यासोबतच पडद्यावर सर्वाधिक वेळा काम केले होते. NTR हे आपल्या कामानिमित्त मद्रासला राहायचे तर त्यांची पत्नी बसवतारकम या हैदराबादला राहायच्या. दोन वेगवेगळ्या शहरांत राहत असल्यामुळे NTR हे कृष्णा कुमारी यांच्या अधिकच जवळ आले.
एनटी रामाराव यांच्या भावाची गर्लफ्रेंडला धमकी
त्या दोघांमधील जवळीक इतकी वाढली की, रामाराव यांनी कृष्णा कुमारीशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर त्यांनी या लग्नाची गुपचूप तयारीही करून ठेवली होती. रामाराव यांनी आपला धाकटा भाऊ निर्माता त्रिविक्रम राव यांच्याकडे ही गोष्ट बोलून दाखवली; मात्र ही बातमी ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. काहीतरी भयंकर घडणार आहे हे ओळखून, ते घाईघाईने मद्रासला रवाना झाले. तिथे पोहोचताच, ते थेट कृष्णा कुमारीच्या घरी गेले आणि त्यांनी तिला धमकी दिली.
त्रिविक्रम राव यांनी कृष्णकुमारी यांना सांगितले की, संपूर्ण आंध्र प्रदेश राज्य NTR यांच्याकडे 'प्रभू श्रीराम' म्हणून पाहते आणि त्यांच्याविषयी प्रेक्षकांच्या मनात एक श्रद्धा आहे, जर लोकांना ते दुसऱ्यांदा विवाह करत असल्याचे समजले, तर त्यांना मोठा धक्का बसेल आणि NTR यांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल.
दुसऱ्या लव्हस्टोरीचा The End
इतकेच नव्हे, तर त्याने बंदुकीचा धाक दाखवून एक ताकीदही दिली. घडलेल्या या प्रकारामुळे कृष्णकुमारी अत्यंत घाबरल्या होत्या. या घटनेनंतर त्या तत्काळ चेन्नई सोडून बंगळुरूला निघून गेल्या. अशा प्रकारे, धाकटा भाऊ त्रिविक्रम राव याच्या मध्यस्थीमुळे NTR चे दुसरे लग्न होऊ शकले नाही.
ज्येष्ठ पत्रकार इमंडी रामाराव यांनी एका मुलाखतीत उघड केले की, ही घटना एन.टी.आर. यांच्या पहिल्या पत्नी, बसवतारकम यांच्या नकळत घडली होती.

