म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसचा मोठा पराभव केल्यानंतर नाशकात भाजपने जोरदार जल्लोष साजरा केला.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 'वसंतस्मृती' कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात ठेका धरीत आनंदोत्सव साजरा केला.
भाजपच्या दमदार विजयाबद्दल नाशिक महानगरतर्फे पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे हाती घेत ठेका धरला. मंत्री गिरीष महाजन, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदींसह मंडल अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
जिल्ह्यातही आनंदोत्सव
पश्चिम बंगालसह इतर तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे येवल्यात व मनमाडमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अन् पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.
राज्यात अराजक
भ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दंडेलशाही, सर्वसामान्यांवर अन्याय व अत्याचार यांनी कळस गाठला होता. तेथील अराजकतेमुळे पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. क्रांतीभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य अराजकतेकडे वाटचाल करीत होते, असे शहराध्यक्ष केदार म्हणाले.
पश्चिम बंगालमधील हुकूमशाही संपली- महाजन
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या दादागिरी आणि हुकूमशाहीला जनता कंटाळली होती. या ठिकाणी भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे त्यामुळे भाजपसाठी हा आनंदाचा दिवस असून, बंगालमधील हुकूमशाही आता संपुष्टात आल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केला. यापुढे ममता बॅनर्जी यांचे कोणी नावही घेणार नसून, आता बंगालचा विकास झपाट्याने होईल, असेही महाजन म्हणाले. नाशिकमधील सिंहस्थाच्या कामांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीदेखील लक्ष घालत आहेत. त्यामुळे सिंहस्थाची सर्व कामे आम्ही वेळेत पूर्ण करू, असा दावाही महाजन यांनी केला.

