Dailyhunt
Nashik-Kalyan Train: 'नाशिक-कल्याण लोकल'ला रेड सिग्नल, घाटाची रुंदी कमी; तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा अशक्य

Nashik-Kalyan Train: 'नाशिक-कल्याण लोकल'ला रेड सिग्नल, घाटाची रुंदी कमी; तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा अशक्य

.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक-कल्याणदरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दीर्घकालीन मागणीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा टोलवाटोलवीची भूमिका घेतली आहे. कसारा-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर आधीच ३६ उपनगरी गाड्या सुरू नवीन लोकलसेवा सुरू करणे हे मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक, पायाभूत सुविधा आणि देखभाल व्यवस्थेवर अवलंबून असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दिले आहे.

कसारा-इगतपुरी घाटाची रुंदी कमी असून, लोकल गाड्यांची रुंदी जास्त असल्याचे उत्तर दिल्याने केंद्र सरकारने नाशिककरांना एप्रिल फूल केल्याचा आरोप खासदार राजाभाऊ वाजेंनी केला आहे.

नाशिककरांच्या पदरी निराशा

या लोकल रेल्वे सेवेसंदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित करीत रेल्वे मंत्रालयाला जाब विचारला. मात्र, मंत्रालयाने दिलेले उत्तर हे तांत्रिक कारणांवर आधारित आणि ठोस कालमर्यादेविना असल्याने पुन्हा एकदा नाशिककरांच्या घोर निराशा पदरी पडली आहे. नाशिकरोड ते कल्याण या मार्गावर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी ही केवळ सुविधा नसून अत्यावश्यक गरज असून विद्यार्थी, शेतकरी, लघु व्यापारी आणि रोजंदारी करणारे हजारो प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करतात.

सध्या मार्गावर लोकल चालवणे शक्य नाही

अनेक स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो, असे खासदार म्हणाले. यावर रेल्वे मंत्रालयाने आपल्या उत्तरात या मार्गावर आधीच ३६ उपनगरी गाड्या सुरू असल्याचे नमूद केले. मात्र, सर्वात महत्त्वाची अडचण म्हणून मंत्रालयाने कसारा-इगतपुरी घाट विभागातील बोगद्यांची मर्यादित रुंदी अधोरेखित केली. लोकल गाड्यांची रुंदी अधिक असल्याने सध्या या मार्गावर लोकल सेवा चालवणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने सदर लोकलसेवा सुरू होणे आता स्वप्नच ठरले आहे.

अडचणी दूर करण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार का, तसेच ही सेवा नेमकी कधी सुरू होणार याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims