Dailyhunt
Navi Mumbai News: 'जेएनपीए'ला जोडणाऱ्या पुलाजवळील मार्ग खचला, जोडरस्त्यासाठी 68 कोटींचा खर्च; 8-10 महिन्यांत प्रकल्पाची दुर्दशा

Navi Mumbai News: 'जेएनपीए'ला जोडणाऱ्या पुलाजवळील मार्ग खचला, जोडरस्त्यासाठी 68 कोटींचा खर्च; 8-10 महिन्यांत प्रकल्पाची दुर्दशा

मुलकुमार जैन, उरण: उरण तालुक्यातील जेएनपीएच्या चौथ्या बंदराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाजवळील जोडरस्त्याचा काही भाग अचानक खचला. सुमारे 68 कोटी रुपये खर्च करूण हा प्रकल्प तयार करण्यात आला होता.

या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करळ परिसरात राष्ट्रीय महामार्ग ४बी आणि राज्य मार्ग ५४ यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

8-10 महिन्यांत मार्ग खचला

सदर उड्डाणपूल जसखार गावाला वळसा घालत थेट चौथ्या बंदराशी जोडण्यासाठी उभारण्यात आला होता. भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या खाजगी बंदराला हा मार्ग जोडतो. मात्र, पूल सुरू होऊन अवघ्या 8-10 महिन्यातच त्याला जोडणारा रस्ता खचल्याने "पूल ठीक, पण रस्ता खचला" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत तसेच संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, काही दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात आहे. मात्र, या घटनेमुळे बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवी मंदिराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी यापूर्वीच केला होता. त्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या प्रकल्पावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.

प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता

याच पार्श्वभूमीवर काही दिवसांवरच रत्नेश्वरी देवीचा जत्रोत्सव येत असून, मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. अशा वेळी मार्ग खचल्याची घटना अधिकच गंभीर मानली जात आहे. मनसेचे पदाधिकारी मंगेश वाजेकर यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची झोप उडाली असून, स्थानिक नागरिकांकडूनही या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दर्जेदार काम आणि कडक देखरेख आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims