म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला नगरसेविकांमधील वाद थेट पोलिस ठाणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ माजली आहे.
काही दिवसांपूर्वीच 'टक्केवारी'च्या आरोपांवरून भाजपच्या दोन महिला पदाधिकार्ऱ्यांमध्ये महापालिकेत जोरदार खडाजंगी झाली होती.
तो वाद शांत होत नाही, तोच नव्या संघर्षाने पुण्यातील भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग २२मधील नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यात अनेक दिवसांपासून अंतर्गत संघर्ष सुरू होता.
पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पक्षांतर्गत अनेकदा तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने पोलिसांत धाव घ्यावी लागल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.मृणाल कांबळे यांनी अर्चना पाटील यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. 'पाटील प्रसिद्धीसाठी असे आरोप करीत आहेत. विकासकामांत अडथळे आणण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट सुरू आहे,' असा आरोप कांबळे यांनी केला.
मृणाल कांबळे यांनी आपले 'मॉर्फ' केलेले 'व्हिडिओ' हे सोशल मीडियावर पसरवून जाणीवपूर्वक बदनामी केली. पोलिस आयुक्तांच्या बैठकीतील विधाने फिरवून ती त्यांच्या तोंडी घालण्यात आली,' असा दावा अर्चना पाटील यांनी केला आहे. -अर्चना पाटील, नगरसेविका
अर्चना पाटील केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप करीत आहेत. विकासकामांत अडथळे निर्माण करण्यासाठी आणि राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी हा सगळा स्टंट सुरू आहे. -मृणाल कांबळे, नगरसेविका
भाजपने पुण्यात काय तीर मारला?
पुणे : 'पुणेकरांनी भाजपला ११९ नगरसेवक दिले, त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. त्यांनी फक्त 'नमो-नमो' म्हणावे, त्यांच्या नळाला पाणी येईल,' अशी उपरोधिक टीका करून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी त्यांनी नेमके काय तीर मारले, अशा प्रश्न उपस्थित केला. पुणे महापालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला बुधवारी भेट दिल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर कथित अघोरी पूजा झाल्याच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केले. 'रोहित पवार यांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्ला राऊत यांनी दिला.

