Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Raigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश

Raigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश

मुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील अंदाजे 3 हजार गॅस सिलेंडर (काही भरलेले तर काही रिकामे) पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीत किंवा नदीकाठावर आढळणाऱ्या सिलेंडरना हात लावू नये, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

चावणे येथील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील एचपीसीएलच्या प्लॉट क्रमांक ई-१/७ मधून हे सिलेंडर पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले. त्यामुळे पाताळगंगा नदीच्या काठावरील विविध गावांमध्ये हे सिलेंडर वाहून येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

धोकादायक ठरु शकतं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. "नदीत वाहून आलेल्या सिलेंडरमध्ये गॅस आहे की नाही किंवा ते सुरक्षित स्थितीत आहेत का, याची खात्री नसते. त्यामुळे उत्सुकतेपोटी किंवा वापरासाठी असे सिलेंडर उचलणे, हलविणे, उघडणे किंवा घरी नेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वतः कोणतीही जोखीम घेऊ नये", असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

सिलेंडर सापडल्यास जमा करण्याचे आवाहन

"ज्या नागरिकांना असे सिलेंडर सापडतील त्यांनी ते स्वतःजवळ न ठेवता एचपीसीएल कंपनी, जवळच्या एचपीसीएल वितरकाकडे, तहसीलदार कार्यालय, खालापूर, तहसीलदार कार्यालय, पेण किंवा उपविभागीय अधिकारी, पेण यांच्या कार्यालयात तात्काळ जमा करावेत", असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

सिलेंडर आढळल्यास त्याची माहिती तातडीने महसूल विभाग, पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला द्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचं आवाहन

मुसळधार पावसामुळे नदीपात्रात विविध वस्तू वाहून येत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, संशयास्पद वस्तूंना हात लावू नये आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित यंत्रणांमार्फत सिलेंडर शोधून सुरक्षितरीत्या परत मिळविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते पाहिल्यानंतर रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती किती भयानक आहे, याची प्रचिती येत आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims