Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ravi Shastri : आयर्लंडविरुद्ध नाही, इंग्लंडविरुद्धही नाहीच; वैभवच्या पदार्पणाबाबत तारीख पे तारीख, माजी कोच रवी शास्त्री भारतीयांच्या मनातलं थेट बोलले

Ravi Shastri : आयर्लंडविरुद्ध नाही, इंग्लंडविरुद्धही नाहीच; वैभवच्या पदार्पणाबाबत तारीख पे तारीख, माजी कोच रवी शास्त्री भारतीयांच्या मनातलं थेट बोलले

मुंबई : पंधरावर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत असला, तरी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही.

मात्र, याच मुद्द्यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी केलेल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. वैभवला आयर्लंडमध्येच खेळवायला हवं होतं, असं सांगताना शास्त्रींनी केलेली एक कमेंट आता व्हायरल होत आहे. सोनी स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान शास्त्रींना वैभवला इंग्लंडविरुद्ध संधी द्यायला हवी का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्कील अंदाजात उत्तर दिलं.

"अरे, त्याला आयर्लंडमध्येच खेळवायला हवं होतं. तिथली मैदानं लहान आहेत. त्याने सहज स्टेडियमच्या छप्परावर चेंडू मारला असता. आयर्लंडची तर पॅन्ट काढून हातात दिली असती. आता इंग्लंडमध्ये त्याला खेळवतील की नाही, ते माहीत नाही," असं शास्त्री म्हणाले. दरम्यान, शास्त्रींनी वापरलेला 'पॅन्ट काढून हातात देणं' हे वाक्य शब्दशः अर्थाचे नसून प्रतिस्पर्धी संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवणं किंवा जबरदस्त धुलाई करणं, या अर्थाने वापरला जातो.

"आयपीएलमध्ये प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली"

वैभवच्या बॅटिंगचं कौतुक करताना रवी शास्त्री म्हणाले की, "त्याला लवकरात लवकर टीमकडून खेळवा, आयपीएलमध्ये त्याने जवळपास प्रत्येक वेगवान बॉलरला फटकवलं आहे. अशा आक्रमक खेळाडूला तुम्ही बेंचवर का बसवताय, हे योग्य नाही."

"१५ वर्षांच्या मुलावर कसला दबाव?"

वैभवचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे त्याच्यावर कोणताही मानसिक दबाव नसल्याचं मतही शास्त्री यांनी व्यक्त केलं. तो फक्त पंधरा वर्षांचा आहे. त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जर तो सुरुवातीच्या दोन-तीन षटकांतच आक्रमक खेळला, तर संघ व्यवस्थापनाला त्याच्यासाठी कायमस्वरूपी जागा तयार करावी लागेल. त्यामुळे त्याला लवकर संधी देणं गरजेचं आहे, असं शास्त्री म्हणाले.

आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही प्रतीक्षा

आयर्लंड दौऱ्यावर वैभव सूर्यवंशी प्रथमच वरिष्ठ भारतीय संघासोबत होता. त्याचं पदार्पण निश्चित मानलं जात होतं. मात्र, दोन्ही टी-२० सामन्यांत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. त्याऐवजी सूर्यांश शेडगे आणि प्रिन्स यादव यांना पदार्पणाची संधी देण्यात आली. त्या मालिकेत भारताला ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात अलगद हा प्रश्न येत होता की, वैभव असता तर त्याने तुफान फटकेबाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं असतं. हीच भावना लक्षात घेत रवी शास्त्रींच्या मनातून आलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही वैभवला संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे, सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या एका धावेवर बाद झाला. त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला अखेर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे आता सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims