मुंबई: वादग्रस्त प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि 'इंडियाज गॉट लेटंट या शोचा सूत्रसंचालक समय रैना पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मोठ्या वादानंतर आणि काही महिन्यांच्या शांततेनंतर त्यानं आपल्या यूट्यूब चॅनेलवर 'Still Alive' नावाचा एक विशेष शो प्रदर्शित केलाय.
या व्हिडिओमध्ये त्यानं गेल्या वर्षभरात त्याच्यासोबत घडलेल्या घटना, कठीण प्रसंगांबद्दल सांगितलंय.
तर २०२५ मध्ये 'इंडियाज गॉट लेटंट' या शोमधील एका अतिशय आक्षेपार्ह जोकमुळं मोठा वाद निर्माण झाला होता. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळं समय रैना आणि त्याच्या टीमवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. यामुळं त्याला त्याचा अत्यंत लोकप्रिय शो यूट्यूबवरून रातोरात काढून टाकावा लागला होता.
पॉवरफुल कॉन्टॅक्ट
नुकत्याच शेअक केलेल्या व्हिडिओत समयनं सांगितलं की, जेव्हा पोलीस तक्रारी आणि मीडियाचा दबाव वाढला, तेव्हा तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. अशा परिस्थितीत त्याला कोणाच्या तरी मदतीची गरज होती. यावेळी कॉमेडियन तन्मय भट्टनं त्याला सल्ला दिला होता की, "भारतात कॉन्टॅक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. तुझा सर्वात पॉवरफुल कॉन्टॅक्ट शोध आणि त्यांच्याकडून मदत घे, अन्यथा मीडिया आणि पोलीस तुझ्या घरी येतील."समयनं आपल्या फोनमधील अशा लोकांचे नंबर शोधायला सुरुवात केली ज्यांचे राजकीय संबंध असू शकतील. त्याने रणवीर अलाहाबादियालाही फोन केला, पण तिथून त्याला म्हणावी तशी मदत मिळाली नाही. तसंच समयनं सांगितलं की, त्या कठीण काळात त्यानं अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. काहींनी तर त्याला मदतीऐवजी उलट सुनावलं.
आईचा तो फोन कॉल...
या संपूर्ण वादात समय सर्वात जास्त भावूक झाला जेव्हा त्यानं त्याच्या आईचा उल्लेख केला. जेव्हा तो या सगळ्या प्रकरणानं पूर्णपणे खचला होता, तेव्हा त्याच्या आईनं त्याला फोन केला.आईला माहित होतं की मी संकटात आहे. तिनं मला फोन करून फक्त एवढंच सांगितलं, 'बाळा, स्वतःची काळजी घे, सगळं नीट होईल.' तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. मला स्वतःची लाज वाटत होती की मी माझ्या आईला अशा परिस्थितीत टाकलं, असं म्हणताना समयच्या डोळ्यात पाणी आलं.

