म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: आगामी २०२९ च्या निवडणुकीपूर्वी संघटना नव्याने उभी करू, असे आश्वासन देतानाच, पक्षात जो कोणी काम करणार नाही, त्याला बाहेरचा रस्ता दाखवू, अशा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.
या पुढच्या काळात व्यक्तीकेंद्रीत पक्ष ठेवू नका असा सल्लाही शिंदे यांनी छगन भुजबळ, गजानन शेलार यांचे नाव न घेता दिला.
शरद पवारांनी पक्ष तसेच नेतेही वाढविलेत. परंतु, हे नेते पक्ष आणि पवारांना सोडून गेले असले तरी, आगामी काळात पक्ष संघटना बांधणीवर भर देऊन संघटनेची मजबूत बांधणी केली जाईल. पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांचे मूल्यमापन घेऊन त्यांना जबाबदारी देण्यात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी प्रभारी सुनील भुसारा, खासदार भास्कर भगरे, प्रदेश उपाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, गोकुळ पिंगळे, लक्ष्मण मंडाले, माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, माणिकराव शिंदे, अनिता दामले आदी उपस्थितीत होते.
शिंदे म्हणाले की, झालेल्या निवडणुकीत उमेदवारांना मदत होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक काळात ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, त्यांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रदेश पातळीपासून गटपातळीवर या नियुक्त्या केल्या आहेत की नाही याची शहानिशा केली जाईल, त्यांचे प्रदेश पातळीवरून नेते पाठवून मूल्याकंन केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यकर्त्यांना उघड्यावर सोडू नका, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही थेट मंत्रालयातून ताकद देऊ, असा शब्द शिंदे यांनी दिला.
संघटनेतील कार्यकर्त्यांनाच पदे
हल्ली विकासकामांऐवजी वेगवेगळ्या स्टॅट्रजीनुसार निवडणुका लढवल्या जात आहेत. आम्ही मात्र मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून संघटना मजबूत करण्यावर जाेर दिला आहे. मी स्वत: संघटना बांधणीवर लक्ष ठेवणार आहे. आयात केलेल्यांपेक्षा संघटनेतील कार्यकर्त्यांनाच यापुढे संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत सुनेत्राताईच निवडूनच येणार होत्या त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पक्षपदाधिकऱ्यांनी झोकून दिले होते, असेही त्यांनी सांगितले.
पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत
सुरुवातीस, प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे एेकून घेतले. यात पदाधिकाऱ्यांनी पक्षातंर्गत गटबाजीवर तक्रारी केल्या. गटबाजी आहे ती थांबविली पाहिजे. पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी घेण्यास कोणीही तयार नव्हते. स्थानिकांना डावलून, नेत्यांनी परस्पर जागा वाटप केले यात पक्षाचे सक्षम उमेदवार असून, देता आले नाहीत. निवडणुकीत उमेदवार उतविल्यानंतर, पक्षाने ताकद दिली नाही, कोणीही विचारायला आले नसल्याची खंत यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. वेळेत सुधारणा न केल्यास पक्षाची अवस्था दयनीय होईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
पदाधिकाऱ्यांना सूचना
स्थानिक प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे काढा
जिल्हास्तरावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्या
जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना ताकद द्या
कोअर कमिटी तयार करून महिन्याला बैठक घ्यावी
महापालिका, विधानसभा निवडणुकीतल पराभवाचा अहवाल सादर करावा
महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी एकत्रित बैठका घ्या
तक्रारींच्या निवारणासाठी विशेष हेल्पलाइन करा
अन्यायाविरोधात 'फायर फाइट टीम' तयार करा

