मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरच्या निधनानंतर, ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता प्रकरणात एक मोठं वळण आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं करिश्मा कपूरची दोन मुलं, समायरा कपूर आणि कियान राज कपूर यांना अंतरिम दिलासा दिला असून, त्यांची सावत्र आई प्रिया कपूरला संजय कपूरच्या मालमत्तेचा व्यवहार करण्यापासून थांबवलं आहे.
संजयच्या मालमत्तेची सुरक्षा महत्त्वाची
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, हे प्रकरण लांबेल आणि संजय कपूरची आई, राणी कपूर, यांचं वय आधीच ८० वर्षे आहे. त्यामुळे, न्यायालयानं त्यांना समेट करण्याचा सल्ला दिला. आता, या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होईल.
उद्योगपती संजय कपूरनं तीन वेळा लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न १९९६ मध्ये नंदिता महतानीसोबत झालेलं. हे लग्न चार वर्षे टिकलं आणि २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर संजयनं २००३ मध्ये करिश्मा कपूरसोबत लग्न केलं. हे लग्न १३ वर्षे टिकलं आणि २०१६ मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. संजयनं २०१७ मध्ये प्रिया सचदेवसोबत लग्न केलं. दरम्यान, संजय कपूर यांचं १५ जून २०२५ रोजी लंडनमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. संजय कपूरनं मृत्यूपत्रात आपली संपूर्ण मालमत्ता कथितरित्या त्याची तिसरी पत्नी प्रिया कपूरच्या नावे केली आहे. करिश्माची मुलं, समायरा आणि कियान यांनी हे मृत्युपत्र 'बनावट' असल्याचं सांगून त्यांनी आपल्या हक्कांची मागणी केली आहे. अलीकडेच, मुलांच्या याचिकेला प्रतिसाद देत, उच्च न्यायालयानं तिसऱ्या पक्षांना मालमत्ता हस्तांतरित करण्यास मनाई केली आहे.

