म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
या वेळी अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, महापालिकेतील गटनेते काका चव्हाण आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केला.
'डीजे' आणि आवाजाच्या वादात न अडकता संपूर्ण सांस्कृतिक आणि पारंपरिक वातावरणात लोकोत्सव कसा साजरा करता येतो, हे पुणेकरच देशाला दाखवून देऊ शकतात,' असे फडणवीस म्हणाले होते. त्यावर टोला लगावताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'लोकमान्य टिळकांनी समाजाला दिशा देण्यासाठी उत्सव सुरू केला, तर 'डीजे'च्या वादासाठी नाही. सरकारने गणेश मंडळांना विश्वासात घेऊन कायद्याच्या चौकटीत मार्ग काढावा. प्रश्न सोडवता येत नसेल, तर सत्ताधाऱ्यांनी तसे स्पष्ट सांगावे.'
'महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेतील गैरप्रकारावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. तंत्रज्ञानाच्या युगात पेपर फुटत असतील, तर तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होत आहे. या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त असून, शेतकरी, आदिवासी, ओबीसी आणि मराठा समाजाला आंदोलन करावे लागत आहे. २०० आमदारांचे सरकार असूनही परिस्थिती बदललेली नाही,' अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
'पुणे क्राइम कॅपिटल'
'पुण्यात ड्रग, चोऱ्या आणि कोयता गँगची दहशत वाढल्याचा आरोप करून सुळे यांनी पुण्याला 'क्राइम कॅपिटल' संबोधले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पुणे गुन्हेगारीत राज्यात पहिल्या आणि देशात पाचव्या क्रमांकावर आहे. पुणेकरांनी सत्ताधाऱ्यांना भरभरून मते दिली; आता सुरक्षितता कधी मिळणार,' असा सवाल त्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

