मुंबई : शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या दमदार सलामीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघावर ७ विकेटने मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
'राजस्थान' कडून १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ९६ धावांची फटकेबाजी केली खरी; पण 'राजस्थान'च्या गोलंदाजांनी निराशा केली. आता ३१ मे रोजी 'गुजरात'ची 'बेंगळुरू' शी अहमदाबाद येथे अंतिम लढत होईल. या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याने केलेली ९६ धावांची खेळी व्यर्थ गेली. प्ले ऑफमधली पराभवानंतर आता राजस्थान बाहेर पडले आहे. राजस्थानने केलेली भावनिक पोस्ट वैभव याने इन्स्टा स्टोरीवर रिपोस्ट केली आहे.
पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
दरम्यान, राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २१४ धावा केल्या. 'गुजरात' ने विजयी लक्ष्य तीन विकेटच्या मोबदल्यात १८.४ षटकांत पूर्ण केले. गिल-साई जोडीने १२.५ षटकांत १६७ धावांची सलामी दिली. अर्धशतकानंतर साई सुदर्शन तिसऱ्यांदा 'हिट विकेट' झाला. फरेराने साई सुदर्शनला १४ धावांवर जीवदान दिले होते. शतकानंतर गिलही बाद झाला. गिलने ५३ चेंडूंत १५ चौकार व तीन षटकारांसह १०४ धावा करून 'राजस्थान' च्या माऱ्यातील हवाच काढून घेतली.
'राजस्थान'ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल दुसऱ्याच घटकात माघारी परतले. यानंतर वैभवने रवींद्र जाडेजाच्या साथीने डाव सावरला. महंमद सिराज, कॅगिसो रबाडा आणि प्रसिध कृष्णा यांनी आखूड टप्प्याचे चेंडू टाकून वैभवची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैभव डोके शांत ठेऊन खेळत होता. त्यात वैभवला नशिबाची साथ लाभली. साई सुदर्शन याच्याकडून ४६ धावांवर त्याचा झेल सुटला. वैभवने रवींद्र जाडेजाच्या साथीने ३७ चेंडूंत ७३ धावा जोडून डाव सावरला. जाडेजाने कोपराच्या दुखापतीमुळे मैदान सोडले. जाडेजा नंतर पुन्हा मैदानात आला तेव्हा पुन्हा या जोडीने धावांचा वेग वाढवला.

