Dailyhunt
Vande Bharat Express: पुण्याहून निघताच 'वंदे भारत'मध्ये तांत्रिक बिघाड! ट्रेन तब्बल दोन तास जागेवरच; प्रवाशांची मोठी गैरसोय

Vande Bharat Express: पुण्याहून निघताच 'वंदे भारत'मध्ये तांत्रिक बिघाड! ट्रेन तब्बल दोन तास जागेवरच; प्रवाशांची मोठी गैरसोय

.टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याहून हुबळीला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या 'पॅन्टोग्राफ'मध्ये बिघाड झाल्यामुळे सोमवारी दुपारी नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे ही एक्स्प्रेस दोन तास जागेवरच उभी होती.

गेल्या आठवड्यातच पुणे रेल्वे स्थानकावर 'मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस'चा डबा रुळावरून घसरल्यानंतर पुण्यातून जाणाऱ्या वंदे भारतमध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.

प्रवाशांची गैरसोय

पुण्याहून हुबळीला जाणारी वंदे भारत सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता पुणे स्थानकावरून रवाना झाली. नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यावर पॅन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे एक्स्प्रेसला होणारा विद्युतप्रवाह खंडित झाला. त्यामुळे ही रेल्वे जागेवरच थांबून राहिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या विद्युत विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी तातडीने पॅन्टोग्राफची तपासणी सुरू केली. त्यातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. ही गाडी रुळावर थांबल्याने पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या गोवा एक्स्प्रेस या गाडीला एक तास उशीर झाला.


पुण्यातून थेट हुबळीला जाण्यासाठी या एक्स्प्रेस गाडीचा फायदा प्रवाशांना होत आहे. त्यामुळे तिकीट जास्त असले, तरी ही गाडी कायम फुल असते. सध्या उन्हाळा असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी वातानुकूलित गाड्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वंदे भारतला चांगलीच गर्दी असते; परंतु सोमवारी 'पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस'मध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप आला सामोरे जावे लागले.

अधिकाऱ्यांमार्फत चौकशी

'मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस'चा एक डबा पुणे रेल्वे स्थानकाजवळ घसरला होता. वंदे भारत रुळावरून घसरल्याची देशातील ही पहिली घटना होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दर्जाच्या (जे ग्रेड) अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मुख्यालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या चौकशीत आढळलेल्या त्रुटी व संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. सोमवारीही 'वंदे भारत'ला वीजपुरवठा खंडित झालेल्या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims