म.टा. प्रतिनिधी, मुंबई/नाशिक: मे महिन्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईकरांना पावसाने सुखद धक्का दिला. नैऋत्य मोसमी पावसाच्या अधिकृत आगमनापूर्वीच रविवारी सकाळी शहरासह उपनगरांमध्ये पूर्वमान्सूनच्या सरी कोसळल्या.
पहाटेपासून दाटून आलेले ढग, गार वारा आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. तर, कल्याणमध्येही पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुंबईत रविवारी पाऊस
४ दिवस यलो अलर्ट
सोमवारी नाशिकमध्ये मुसळधारेची शक्यता
अरबी समुद्रातून येणारे दमट वारे आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे उत्तर महाराष्ट्र, घाटमाथा आणि लगतच्या भागांत पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, तसेच पश्चिमेकडील डोंगराळ पट्ट्यात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी शनिवार आणि रविवारी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. रविवारी (दि. ३१) सायंकाळपासून पुन्हा सोमवारी दिवसभराकरिता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. याशिवाय २ ते ४ जून या काळात यलो अलर्ट असणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

