Dailyhunt
West Bengal Election Exit Poll 2026: 70% लोकांनी तर...; बंगालच्या Exit Poll मध्ये ट्विस्ट; Axis My India चा आकडे जाहीर करण्यास नकार

West Bengal Election Exit Poll 2026: 70% लोकांनी तर...; बंगालच्या Exit Poll मध्ये ट्विस्ट; Axis My India चा आकडे जाहीर करण्यास नकार

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काल संपली. दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपल्यावर अनेक संस्थांचे एक्झिट पोल आले. काही एक्झिट पोल्सनुसार राज्यात तृणमूल काँग्रेसचं सरकार कायम राहण्याचा अंदाज आहे.

तर बहुतांश एक्झिट पोल्सनी सत्तांतराचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपचं सरकार येईल, अशी शक्यता बहुतांश एक्झिट पोल्सनी वर्तवली आहे. पण देशातील प्रमुख पोलिंग एजन्सी ऍक्सिस माय इंडियानं पश्चिम बंगालसाठी एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे.

ऍक्सिस माय इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना एक्झिट पोल प्रसिद्ध न करण्यामागचं कारण सांगितलं. 'आम्ही ज्या मतदारांचे सॅम्पल घेतले, त्यातील ७० ते ८० टक्के मतदारांनी तोंडच उघडलं नाही. त्यामुळे जनमताचा अंदाजच आला नाही. सॅम्पलच्या विश्वासार्हतेबद्दल शंका असल्यानं आम्ही एक्झिट पोल जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. ऍक्सिस माय इंडियाचा भर समोरासमोर घेतलेल्या मुलाखतींवर असतो. पण यावेळी आम्हाला मतदारांमध्ये बरीच चलबिचल दिसली. अनेक जण स्पष्टपणे बोलण्यास तयार नव्हते,' असं गुप्ता यांनी सांगितलं.

'पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आम्ही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ६० ते ७० टक्के लोकांनी बोलण्यास नकार दिला. हो की नाही यामध्येही उत्तर देण्यास ते तयार नव्हते. अर्धवट आणि कोणत्याही सॅम्पलचा आधार नसताना अंदाज बांधणं ठीक होणार नाही,' असं गुप्ता म्हणाले. '२० ते ३० टक्के सॅम्पलच्या आधारावर कोणताही अंदाज वर्तवणं ठीक होणार नाही. त्यामुळे आम्ही गुरुवारी पुन्हा एकदा प्रयत्न करु. आता निवडणूक होऊन गेली आहे. त्यामुळे कदाचित मतदार मोकळेपणानं बोलतील, अशी अपेक्षा आहे,' असं गुप्ता म्हणाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अनेक एजन्सीनी सर्व्हे केले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सनुसार राज्यात सत्तांतर घडून भाजपची सत्ता येईल. राज्यात पहिल्यांदाच भाजपचं सरकार येण्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आलेला आहे. पण पीपल्स पल्स आणि जनमत पोल्सनुसार तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहू शकते. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेसला १७७ ते १८७ जागा मिळू शकतात. तर भाजपला ९५ ते ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे. जनमत पोल्सच्या एक्झिट पोलनुसार, तृणमूलला १९५ ते २०५ जागा, भाजपला ८० ते ९० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims