औरंगाबाद : फेब्रुवारी २०२० मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद शहराचा जुना आणि नवीन विकास आराखडा एकत्रित तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र मागील दहा महिन्यात विकास आराखडा तयार करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती देखील केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अद्यापही शहर विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या शहर विकास आराखड्याची शहरवासीयांना प्रतीक्षा आहे. यावेळी तरी नियमांत राहून हा आराखडा तयार करावा, अन्यथा पुन्हा तो वादात सापडेल, अशीही अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
शासन निर्देशांनुसार प्रत्येक मोठ्या शहराचा विकास आराखडा दर वीस वर्षांनी तयार करणे अभिप्रेत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाचा निकाल आलेला नसताना १२ फेब्रुवारी २०२० रोजी पालिकेला पत्र पाठविले. नगरविकास विभागाच्या अव्वर सचिव वीणा मोरे यांनी या पत्रात नमूद केले आहे की, मूळ हद्दीची सुधारित विकास योजना २००१ मध्ये मंजूर केलेली आहे. वाढीव हद्दीची प्रारूप विकास योजना मात्र न्यायप्रविष्ट आहे. नियोजन प्राधिकरणाच्या संपूर्ण क्षेत्राचा विचार करता, मूळ व वाढीव भागाचा आराखडा एकत्रित तयार करण्याचे आदेश नगररचना अधिनियम १६६ चे कलम १५४ अन्वये ऑक्टोबर २०१५ ला दिलेले आहेत. त्यानुसार पालिकेमार्फत पुढील कारवाई करावी, अशी सूचना केली.

