Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत  - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ०१ : राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.

अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ वरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार कोकण विभागातून १,०२,३३५, नाशिक विभागातून ३,३३,३८५, पुणे विभागातून ६,०७,६६३, कोल्हापूर विभागातून २,४०,२५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३,२५,०००, लातूर विभागातून २,४२,८२६, अमरावती विभागातून ६,९१,९७३ आणि नागपूर विभागातून ४,५३,३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून, मराठवाडा विभागातून सर्वाधिक तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारी दिसून येते.

पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी”, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत कोणताही विलंब न करता १० ऑगस्टपूर्वी पीक विम्यासाठी अर्ज करावा.

“प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट तसेच हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करत असून, सर्व शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ अर्ज करावा,” असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करावा किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा.

0000

संध्या गरवारे/विसंअ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan