मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील दिवाणी न्यायालयात शनिवार, दि.१८ जुलै २०२६ रोजी
'विशेष लोकअदालतीचे' आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित वाद सामोपचाराने मिटवण्याची मोठी संधी नागरिकांना मिळणार आहे.
कलम १३८ (चेक बाऊन्स) च्या प्रकरणांवर होणार सुनावणी
या विशेष लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा, १८८१ मधील कलम १३८ (धनादेश अनादर/चेक बाऊन्स) अन्वये दाखल असलेली प्रकरणे सामोपचाराने आणि तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी ठेवली जाणार आहेत. कोर्टाची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया टाळून कायदेशीर मार्ग काढण्याची ही उत्तम संधी आहे.
वेळ, पैसा आणि श्रमाची होणार बचत!
लोकअदालतीत तडजोडीने निकाली निघालेल्या प्रकरणांमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक श्रम यांची मोठी बचत होते. परस्परांच्या संमतीने वाद मिटवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.- न्या. वृषाली पाटील (दिवाणी न्यायालय, मंगळवेढा)
पक्षकारांनी काय करावे?
या कायद्यांतर्गत ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, अशा फिर्यादी व आरोपींनी आपल्या वकिलांमार्फत किंवा थेट न्यायालयाशी संपर्क साधून आपले प्रकरण या विशेष लोकअदालतीत ठेवण्याबाबत आवश्यक ती पूर्वतयारी व कार्यवाही करावी, असे आवाहन न्यायालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

