Dailyhunt
वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, 'या' चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

वादळी वारा अन् विजांचा कडकडाट; राज्यात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता, 'या' चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मंगळवेढा टाईम्स न्युज।

पुढील काही दिवसांत वातावरण बदलणार असून काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

एप्रिलपाठोपाठ मे महिन्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे उष्मघातामुळे काहींचा बळी गेला आहे. या जीवघेण्या उष्णतेपासून पुढील काही दिवसांत सुटका होऊ शकते.

राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आज सोमवारी ४ मे रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.

या भागासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ५ मे रोजीही विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज आहे.

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला गेला आहे. तर बुधवारी ६ मे रोजी पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल असा अंदाज आहे. त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times