Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Sanjay Shirsat : 'ऑपरेशन तुतारी'च्या चर्चांनी राजकारणात खळबळ; अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांना उधाण

राज्यातील राजकारणात सध्या पक्षांतराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून, 'ऑपरेशन टायगर'नंतर आता 'ऑपरेशन तुतारी'ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.

“योग्य ऑफर आल्यास त्यावर विचार केला जाऊ शकतो,” असे त्यांनी म्हटल्याचा राजकीय अर्थ काढला जात असून, यावरून विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील कोणताही नेता पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी अमोल कोल्हे यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमोल कोल्हे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि महत्त्वाचे नेते असल्याने त्यांचे वक्तव्य केवळ वैयक्तिक मत नसून त्यामागे पक्ष नेतृत्वाची भूमिका असू शकते, असा दावा शिरसाट यांनी केला.

रोहित पवार यांच्या भूमिकेवरही भाष्य करताना संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. वेळोवेळी भूमिका बदलणे ही त्या पक्षाची जुनी कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, “ऑफर मिळाल्यास पुढील निर्णय घेण्याची तयारी आधीपासूनच दिसून येते,” असे म्हणत त्यांनी अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बदलाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करत, अशा परिस्थितीत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात, असेही नमूद केले. 'ऑपरेशन तुतारी'च्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात विरोधी पक्षांतील नेत्यांची भूमिका आणि संभाव्य राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mumbai Outlook