पूर्वीच्या काळी शेजारधर्माला फार महत्व असे. घर विकत घेण्याआधी किंवा एखाद्या ठिकाणी भाड्याने जरी राहायला जायचे असेल तरी शेजार कसा आहे याचा विचार केला जात असे. त्यातूनच आपल्या बाजूला राहणाऱ्यांची आवर्जून विचारपूस केली जात असे.
त्यामुळे नकळत शेजाऱ्यांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हायचा. शेजारी पाजारी कुटुंबाचा एक भागच होऊन जायचे. त्यातूनच मग शेअरिंग आणि केअरिंगही व्हायचं. अडीअडचणीला शेजाऱ्यांचा आधार वाटायचा. पण काळ बदलला. आणि जो तो मी आणि माझं कुटुंब यात रमला. त्यामुळे आता असा शेजारधर्म फार कमी झालाय. पण खरं तर उत्तम मानसिक आरोग्यासाठी आज प्रत्येक कुटुंबाला चांगल्या शेजाऱ्यांची गरज आहे. असे तज्त्रांचे मत आहे.
सुरक्षितता
जेव्हा तुमचे शेजाऱ्यांशी चांगले संबंध असतात तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटते. कारण कोणतीही अडचण आली तर नातेवाईकांआधी शेजारी तुमच्या मदतीला धावून येतात. त्यातही जर मेडीकल इमेरजन्सी असेल त्यावेळी शेजारीच मदत करतात. त्यामुळे जवळचे कोणी आपल्या बाजूला आहे ही कल्पनादेखील माणसाला आतून सुरक्षित बनवते. जर तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्हाला शेजाऱ्यांचा रुपात सोबतीही मिळतो.
हसून खेळून राहणे
जर तुम्ही शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून लांब राहाल तर तुमच्या अडचणीत ते तुमच्या कामी येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जर तुम्हाला त्यांचा तुमच्या घरातील हस्तक्षेप खटकत असेल तर त्यांना न टाळताही तुम्ही शेजारधर्म पाळू शकता. त्यासाठी शेजारी कधी लिफ्टमद्ये, गार्डन, रस्ते, दुकानात भेटले तर त्यांना हसून हाय हॅलो करावा. त्यामुळे तुमच्यात ओळखीचे नाते तयार होईल.
नवीन घर
जर तुम्ही नवीन अपार्टमेंट किंवा नवीन कॉलनी, दुसऱ्या शहरात शिफ्ट झालात तर स्वत:हून शेजाऱ्यांना भेटा. परदेशातही अशाप्रकारे नवीन जागी राहावयास गेल्यावर शेजाऱ्यांना घरी बोलवून आदरातिथ्य केले जाते. ओळख होते.
शेजाऱ्यापाजाऱ्यांशी नक्कीच मैत्री करावी. पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवावे की त्यांच्या खासगी आयुष्यात तुमचा आणि तुमच्या खासगी आयुष्यात त्यांचा हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी.
तसेच सतत काही ना काही मागण्यासाठी शेजाऱ्यांकडे जावू नये.
त्यांचा आपल्याला व आपला समोरच्याला कंटाळा येईल एवढी जवळीकही शेजाऱ्यांबरोबर वाढवू नये. त्यामुळे नाते थोडक्यात पण टिकून राहते.

