रेमडेसिवीरचा साठा खासगी व्यक्तीला करता येत नाही. असे असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साठा करण्याची परवानगी कशी काय मिळाली? केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केला. कोरोना संकटाच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
आज राज्यात रेमेडीसीवर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर जे घाणेरडे राजकारण करत आहे ते निषेधार्ह आहे. रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमिवर काही कोटींचा रेमडेसीवरचा साठा कुठून आला ? याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

