मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांना विधानपरिषद उमेदवारी शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) जाहीर करण्यात आली आहे.
परस्पर उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं होते. तसेच, काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं देखील बोललं जात होते. अखेर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तब्बल दोन ते तीन तास बैठक झाली.
यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.
MLCमध्ये नाव नाही, 'सतरंजी उचले' म्हणून ट्रोल, संतप्त केशव उपाध्येंनी सोडलं मौन
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "आम्ही भाजपशी लढतो. अत्यंत असंवैधानिक पद्धतीने २०२२ मध्ये सत्तांतर करण्यात आले. ५० खोकेचा नारा बुलंद झाला. २०२४ च्या निवडणुकीत भाजपविरोधातील इंडिया आघाडी निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळाले. विधानसभेत वोट चोरीचे प्रकार झाले. पैसा फेकचा तमाशा झाला. तेव्हा आलेले निकाल आम्ही स्वीकारले. तीनही पक्षांनी महाविकास आघाडीत काम केले आहे. २०२९ मध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जावू."
"राज्यसभेच्या निवडणुकीतून शरद पवार राज्यसभेत गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधानपरिषदेत जावे, ही आमची धारणा होती. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत जाणार नसल्याचे बुधवारी सांगितलं. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली. ही देताना कुठेतरी प्रक्रिया होणे गरजेचं होते. उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही समर्थन करतो. आगामी काळात आम्ही भाजपच्या विरोधात उभे ठाकणार आहोत," असे सपकाळांनी स्पष्ट केले.
"पुढेही आम्ही महाविकास आघाडी म्हणून कायम राहू. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत आमची आघाडी राहणार आहे. निवडणूक लागल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना फोन करून समन्वय ठेवण्यासाठी गळ घातली होती. राज्यसभेला एक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेली. आता विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत. आता पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल," असे म्हणत सपकाळांनी एकप्रकारे पुढील राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीवर दावा केला आहे.
"काँग्रेस पक्षाचा पाठिंबा अंबादास दानवेंना राहणार आहे," असे देखील सपकाळांनी स्पष्ट केले आहे.
बच्चू कडूंना उमेदवारी जाहीर, मग दुसरं कोण? एकनाथ शिंदेंनी थेट नावच जाहीर केलं

